ग्राहकांचा भ्रमनिरास : महागड्या सेवेचा भुर्दंडदेवळी : सेवेतील ढिसाळपणा आणि प्रशासनातील अनेक त्रुट्यांमुळे येथील बीएसएनलच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेटची सेवाही उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. हा प्रकार नित्याचाच झाल्यामुळे अनेकांनी ही सेवा काढून महागड्या खासगी सेवेचा आधार घेतला आहे. खा. रामदास तडस यांच्या गावातच जर हा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहे.तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी येथे बीएसएनलचे कार्यालय व सुसज्ज यंत्रणा आहे. पण सेवा योग्य प्रकारे मिळत नसल्याची ओरड ग्राहक करीत आहेत. सर्वच क्षेत्रात मोबाईल व इंटरनेटचा वापर अत्यावश्यक झाला आहे. शैक्षणिक कार्यासोबतच उद्योग व्यवसायातला भरारी देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परंतु इंटरनेट सेवा कुचकी ठरत असून टूजी व थ्री जी सारख्या सेवा नावाच्याच ठरल्या आहे. लॅन्डलाईन फोन धारकांना प्रत्येक महिन्यात मिळणाऱ्या बिलात अनेक त्रुटी आढळत आहे. त्रुट्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना देवळी आणि वर्धा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अशा अनेक तक्रारींमुळे ग्राहकांचा भम्रनिराश होत आहे. या सर्व प्रकारांमुळे ग्राहकांना महागडी खासगी सेवा वापरावी लागत आहे. बीएसएनएल प्रशासनाने याकडे लक्ष ग्राहकांना योग्य व सुरळीत सेवेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
प्रशासकीय ढिसाळपणामुळे बीएसएनलची सेवा कुचकामी
By admin | Updated: January 24, 2016 02:08 IST