गावोगावी कापूस, धान्य खरेदी रोखीने : ५ हजार ६०० रुपयांवर मिळतोय कापसाला भावप्रशांत हेलोंडे वर्धाकाळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचारावर आळा घालणे, बँकांचे व्यवहार वाढविणे, रोखीचे काळे व्यवहार थांबविणे यासाठी केंद्र शासनाने ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या निर्णयाचा धसका घेत व्यापाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी धडपड चालविली आहे. परिणामी, सध्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला भाव देत जुन्या नोटांची रदबदली करीत आहे. यावरून काळ्या पैशाला सध्या पांढऱ्या सोन्याचा आधार असल्याचेच दिसते.खरीप हंगामातील शेतमाल सध्या शेतकऱ्यांच्या घरी येत आहे. दिवाळीपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. यातील रकमेतून सण साजरा केला. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन निघायचे असल्याने त्यांनी आता विकायला काढले; पण शेतकऱ्यांना नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसतोय. बाजार समितीमध्ये कापूस, धान्य खरेदी करणारे व्यापारी उधारीवर वा धनादेश देऊन खरेदी करीत आहे. काही व्यापाऱ्यांकडील रोखीचे व्यवहार थांबलेत; पण कुठेही नोंद नसलेल्या व्यापाऱ्यांना संधीच चालून आली आहे. हे व्यापारी आजही रोखीने व चलनातून बाद झालेल्या नोटांच्या माध्यमातून व्यवहार करीत आहेत. काही ठिकाणी तर बाजार समितीशी जुळलेले व्यापारी, जिनिंग-प्रेसिंगमध्येही ५००, १००० च्या नोटांवर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.जिल्ह्यात बऱ्याच भागात कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. देवळी तालुक्यात सुमारे २०-२२ हजार क्विंटल तर सेलू तालुक्यातही सुमारे १६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. धनादेशाद्वारे कापसाची खरेदी सुरू आहे. सेलू बाजार समितीत तर रोख चुकारे पाहिजे असल्यास कापूसच परत न्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले. अधिकृत व्यापारी कुठेही रोखीने अनधिकृत व्यवहार करण्यास तयार नाहीत. असे असले तरी बहुतांश धान्य, कापूस खरेदी करणारे व्यापारी रोखीने व्यवहार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वच तालुक्यात गावोगावी जाऊन कापूस खरेदी करणारे व्यापारी सक्रीय झाले आहेत. या व्यापाऱ्यांमार्फत कापसाला ५ हजार ६०० रुपयांपर्यंत भाव दिले जात आहे. सर्व चुकारा ५०० व १००० च्या नोटांच्या माध्यमातून होत आहे. या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा ‘अनअकाऊंटेड मनी’ पांढरा होत असल्याचे दिसून येत आहे. धनादेशाने व्यवहार केल्यास ५००, १००० च्या नोटांच्या माध्यमातून घरी असलेला काळा पैसा व्यर्थ ठरेल, करही भरावा लागेल. ही बाब लक्षात घेत व्यापारी काळा पैसा पांढरा करीत आहेत.सेलू व देवळी तालुक्यात सुमारे ३८ हजार क्विंटल कापूस खरेदीदेवळी बाजार समिती अंतर्गत व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. यात २४ तासांत धनादेशाद्वारे चुकारे दिले जात आहे. देवळीतील संजय इंडस्ट्रीजमध्ये ४ हजार ४९३, जय बजरंग जिनिंगमध्ये २ हजार ५२४, मॉ. नरसाई जिनिंगमध्ये १९६ क्विंटल, के.के. फायबरमध्ये १ हजार ८६ क्विंटल, श्रीकृष्ण जिनिंगमध्ये ५५२ क्विंटल तर मोहन ट्रेडिंगमध्ये ११९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. मंगळवारी दुपारपर्यंत १० हजार १७७ क्विंटल कापसाची खरेदी झाली. पुलगाव येथे दोन केंद्रांवर २ हजार २५० क्विंटल कापूस खरेदी झाली.वायगावच्या गजानन महाराज प्रक्रिया केंद्रावर ३ हजार ५००, संस्कार अॅग्रोमध्ये ७ हजार ५०० तर कानगाव येथे ४०० क्विंटल कापूस खरेदी झाली. सिंदी रेल्वे बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी सुरू असून १६ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. यात सर्वज्ञ जिनिंग हिंगणी ८ हजार ७९०.०६, साईनाथ टेक्सटाईल्स जुवाडी ५ हजार १५०.७८ तर गिरीराज कोटेक्स सेलू येथे २ हजार ६३६.१८ क्विंटल कापूस खरेदी झाली. रोखीने चुकारे हवे असलेले शेतकरी धान्य, कापूस परत घेऊन जात आहे. सेलू संस्कार अॅग्रो कापूस संकलन केंद्र सुरू आहे; पण त्यांचा परवाना थेट म.रा. पणन मंडळाचा आहे.शेतकऱ्यांच्या रकमांवर बँकेतील अधिकाऱ्यांना संशयरविवारी एका बँकेत कापूस चुकाऱ्याचे अडीच लाख रुपये शेतकरी बँकेत घेऊन गेला. व्यवहाराच्या पावत्यांसह सर्व कागदपत्रे होती; पण सातबारा नव्हता. दोन तास रांगेत लागूनही त्याला रक्कम जमा करता आली नाही. अखेर घरुन सातबारा आणावा लागला. यानंतर त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली. अडीच लाखांपर्यंतच्या रकमेची विचारणा होणार नसल्याचे केंद्र सरकार सांगत असताना हा प्रकार घडला. कापूस खरेदीतून प्राप्त रकमेचा भरणा करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांकडे बँकेतील अधिकारी शंकेच्या नजरेने पाहायला लागले आहे.
काळ्या पैशाला पांढऱ्या सोन्याचा आधार
By admin | Updated: November 16, 2016 00:50 IST