वायगाव (नि.) : जिल्ह्यातील पाच हजार ७४ शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून वीज मिटर लावण्याची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीच्यावतीने कृषीपंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून शेतकऱ्यांचा ओलिताचा प्रश्न सुटावा हा उद्देश आहे. मात्र अंमलबजावणी अभावी याचा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.कृषीपंपाने शेतीकरिता मुबलक पाणी मिळावे म्हणून विद्युत मिटर लावण्याचे निकष आहे. यासाठी विद्युत वितरण कंपनीकडे सहा हजार ६०० रूपये डिमांड म्हणून जमा करावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्युत मिटर दिले जाते. मात्र जिल्ह्यातील देवळी विभागातील १ हजार १६६ कृषी विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे. तसेच आर्वी विभागात १ हजार ९५८ तर हिंगणघाट विभागात १ हजार ९५० असे एकुण ५ हजार ७४ शेतकरी विद्युत मिटरच्या प्रतीक्षेत आहे. यातील सर्व शेतकऱ्यांनी मिटरसाठी डिमांड भरले आहे. तरीही दोन वर्षापासून वीह मितरची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीकडून या शेतकऱ्यांना मिटर जोडणी दिलेली नाही. या शेतकऱ्याच्या शेतात अद्याप मिटरची जोडणी न केल्याने शेतकऱ्याना ओलिताचा प्रश्न सतावत आहे. यामुळे दरवर्षी नाहक लाखो रूपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रब्बी पिकांत चना, गहू, कडधान्य व पालेभाज्याचे लागवड करतात. रब्बी पिकाकरिता ओलिताची गरज भासते. यासाठी शेतकरी डिझेलपंप लावून पिकांना पाणी देतात. मात्र डिझेलचा खर्च परवडत नसल्याने बरेचदा शेतकरी हात आखडता घेतात. ही गैरसोय टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी वीज मिटरकरिता डिमांड भरुनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यातच यंदा शेतकरी कोरडा दुष्काळाचा सामना करीत असल्याने पिकांना ओलिताची गरज आहे. याकरिता विद्युत मिटर व जोडणीची आवश्यकता शेतकऱ्यांना आहे. काही शेतकऱ्यांच्या अद्याप वीज पोहोचली नाही. कृषी मंत्रालयाकडून विद्युत वितरण कंपनीला अनुदान मिळालेले नाही, अशी माहिती आहे. मत्र शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लगत आहे. डिमांड भरुनही शेतकरी वीज जोडणीकरिता कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहे. (वार्ताहर)
पाच हजार ७४ शेतकरी वीज मिटरच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: July 9, 2014 23:49 IST