अमोल सोटे - आष्टी (श़)पाण्याचा व कोळशाचा तुटवडा आणि विजनिर्मितीसाठी तोकडी भांडवलव्यवस्था यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य शासनाने गाव तिथे सौर दिवे कल्पना उदयास आणली. त्याची अंमलबजावणीही झाली; मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी आजघडीला वर्धा जिल्ह्यातील २१७ ग्रामपंचायतीमधील ४९३ सौरदिवे भंगार झाले आहेत. शासनाची लाखो रुपयाने धूळदान झाली आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सौरदिवे संकल्पना लगेच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.वर्धा जिल्हा निर्मल, हागणदारीमुक्त, रोजगाराभिमुख, उर्जासंपन्न व्हावा म्हणून शासनाच्या अनेक योजना तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांनी राबविल्या. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या परिश्रमातून अनेक समस्या मार्गी लागल्या. शासनाच्या पर्यावरण ग्राम संतुलीत समृद्ध प्रकल्प, पाणलोट प्रकल्प, तंटामुक्त गाव समिती पुरस्कार योजनांसह विविध योजनेमधून गावागावात सौरउर्जेवरील दिवे लागवण्यात आले. एका दिव्यासाठी १२ ते १५ हजार रुपये खर्च झाला.जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास वर्धा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये ६० सौरदिवे, समुद्रपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतमध्ये २६ दिवे, हिंगणघाट तालुक्यातील ४० ग्रामपंचायत मध्ये ८३ दिवे, देवळी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतमध्ये ३७ दिवे, सेलू तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये ५२ दिवे, आर्वी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये १०२ सौरदिवे, आष्टी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये ६५ दिवे तर कारंजा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये ६८ सौरदिवे लावण्यात आले.सन २०१२-१२, २०१२-१३ या वर्षात ८० टक्के तर सन् २०१३-१४ वर्षात २० टक्के सौरदिवे बसविण्यात आले. हे दिवे कंपनीकडून खरेदी केल्यावर ग्रामपंचायतीला पाठविण्यात आले. ग्रामसभेतून वॉर्डनिहाय गरज लक्षात घेत त्यांचे वितरण करण्यात आले. दिवे लावण्याकरिता सिमेंट-काँक्रीटच्या खड्यात पोल उभारण्यात आले. सौरउर्जावर असल्यामुळे या दिव्यांचा फायदा होईल असे गावकऱ्यांना वाटत होते; पण गावातील काही भुरट्या चोरांची नजर सौरउर्जेवरील दिव्यांच्या बॅटरीवर गेली. टप्प्याटप्प्याने बॅटरी व काही उपकरणे चोरी जाण्याच्या घटना घडू लागलया. बॅटऱ्या नसल्याने हे दिवे भंगार बनले आहे. आता दिव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास ९० टक्के सौरदिवे पांढरा हत्ती बनले आहे. या दिव्यांचा प्रकाश ग्रामीण भागातील नागरिकांकरिता सध्या तरी कठीण झाला आहे.
जिल्ह्यातील ४९३ सौरदिवे भंगार
By admin | Updated: July 10, 2014 23:44 IST