ठाणे : कल्याणनीजकच्या वडवली गावातील विजय भोईर (२९) याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अक्षय एकनाथ भोईर (२०), रफीक युनूस शेख (२७) आणि रवी परशुराम ठाकरे यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येसाठी त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विजय २५ आॅगस्ट २०१६ पासून बेपत्ता होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ रवींद्रने तक्रार दिली होती.विजयच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे नंतर अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. स्थानिक पोलिसांनी तपास करुनही फारसे काही हाती लागले नव्हते. दरम्यानच्याच काळात गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने या खूनाचा समांतर तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी अक्षय, रफीक आणि रवी यांना अटक केली. या खूनासाठी त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले. अर्थात, देणारा कोण? आणि खूनाचे नेमके कारण त्यासंबंधीचा सखोल तपास सुरू असल्याचे पोल्ीास उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आधी तरुणाचे अपहरण; नंतर खून
By admin | Updated: September 9, 2016 03:02 IST