अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने लसीकरण करण्यासाठी सकाळी सात वाजता नागरिकांना टोकनचे वाटप केले जाते. मात्र, टोकनच्या एकूण संख्यापैकी अनेक टोकन पालिकेतील कर्मचारी आणि त्यांच्याशी संलग्न असलेले दलाल परस्पर लाटत आहे. त्यामुळे रात्रभर रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या हाती निराशा येत आहे.
पालिकेच्या वतीने लसीकरणासाठी देण्यात येणारे टाेकन मिळविण्यासाठी नागरिकांवर रस्त्यावर झाेपण्याची वेळ येते. मात्र, टाेकन वाटपात पारदर्शकता नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या निगराणीत हे टोेकन वाटप होत असले तरी पालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी हे काही टोकन स्वतःसाठी राखून ठेवत आहेत. काही कर्मचारी दलालांना हाताशी धरून हे टोकन ३०० ते ५०० रुपयांत विकले जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. एकूण टोकनपैकी केवळ निम्मेच टोकन रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मिळत आहेत. टोकन मिळाल्यानंतर लस मिळणार ही बाब उघड झाल्याने आता काही दलाल रात्रभर रांगेत उभे राहून टोकन मिळाल्यावर त्याची परस्पर विक्री करण्याचे काम करीत आहेत.
रांगेत उभे राहणारे दलाल आणि पालिकेचे काही कर्मचारी यांनी तयार केलेले दलाल यांच्या विळख्यात नगरपालिकेची लसीकरण मोहीम सापडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रांगेत उभ्या असलेल्या अनेक नागरिकांपैकी काही नागरिक हे दररोज रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. नियमित रांगेत दिसणारे व्यक्ती हे टोकनची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे.
----------
रांगेत आठवा क्रमांक, टाेकन मिळाला १६८ नंबरचा
* अंबरनाथ नगरपालिकेत टोकन वाटप होणार असल्याने रात्री दहा वाजल्यापासून काही नागरिक रांगेत उभे राहत आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. रात्रभर या महिलांना टोकनसाठी रस्त्यावर झोपावे लागत आहे. एवढे केल्यानंतरही सकाळी टोकन मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही.
* बुधवारी पहाटे रांगेत उभ्या असलेल्या एका नागरिकाचा आठवा नंबर असतानाही त्याच्या वाट्याला १६८ नंबरचा टोकन आला. यावरून उघड झाले आहे की दीडशेहून अधिक टोकन हे परस्पर इतरांना वाटले जात आहे. रांगेतील आठव्या क्रमांकाच्या व्यक्तीला किमान बारा ते पंधरा क्रमांकाचा टोकन मिळणे अपेक्षित होते. त्यांना १५० च्या पुढचे आकडे मिळाल्याने या टोकन वाटपमध्ये घोळ असल्याची बाब स्पष्ट हाेत आहे.
* टोकनसाठी ज्या व्यक्ती रांगेत उभे राहू शकत नाहीत. ते लोक काही दलालांना ३०० ते ५०० रुपये देऊन रांगेत उभे करीत आहेत आणि त्यानंतर टोकन मिळाल्यावर त्या टोकनचा वापर करून लस घेत आहेत. टोकन मिळविण्यासाठीही दलालांची टोळी निर्माण झाली आहे. दररोज दिसणाऱ्या या दलालांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.