ठाणे : ठाणे जिल्ह्याला कोरोना लसींचा अपुरा साठा मिळत असल्याने एक दिवस लसीकरण केले की, पुढे दोन-तीन दिवस लसीकरण केंद्रांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.
शनिवारी सायंकाळी लसींचा साठा उपलब्ध झाल्याने सोमवारी लसीकरण सुरू झाले. मात्र, अवघा एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने मंगळवारी ठाणे शहरातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी पुन्हा अवघा २५ हजार कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे बुधवारी मोजक्याच लोकांचे लसीकरण होईल. लसींचा अपुरा साठा उपलब्ध होत असल्याने नागरिक तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत.
सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर वेगाने लसीकरण होणे हाच प्रभावी पर्याय आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत. उपलब्ध होणाऱ्या लसींचे डोस युद्धपातळीवर देण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसींचा प्रचंड तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा फटका शहरातील लसीकरणाला बसत आहे. अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ओढवली. मागील आठवड्यात अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे सलग चार दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती.
.............
वाचली.