ठाणे : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु असतानाच जिल्हा प्रशासनाने बेघर व भटक्या नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये वास्तव्यास असलेल्या ४५ भिक्षुकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना दोनही डोस देण्यात आले आहेत.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी आदींचे टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरु झाले. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. परंतु ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आजही सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर शेकडो भिकारी भीक मागताना दिसत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गजरे विकणे, फुगे विकणे, वाहने साफ करणे आदी व्यवसाय ही मंडळी करतात. या मुलांचा दररोज शेकडो लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे या मुलांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यात या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने भिकाऱ्यांसाठी जांभूळगाव येथे शेल्टर होम आहे. या शेल्टर होममध्ये असलेल्या भिक्षुकांचे लसीकरण करण्यासाठीचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या शेल्टर मधील ४५ भिक्षेकरुंचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.