सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी २२६२.७१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी तो केवळ १५४४.७९ मिमी होता. यंदा संततधार सुरू असलेल्या पावसादरम्यान विविध कारणांनी सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला असून ८९ जणांचा जीव वाचवण्यात यश मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाद्वारे केला जात आहे. सुमारे सरासरी ७१७.९२ मिमी जादा पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२.३५ टक्के पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात (११४.५९ टक्के) पडला आहे. जिल्ह्यातील ४० गावांना या पावसाचा जोरदार फटका बसला असून त्यांची झळ ३३४ ग्रामस्थांना बसली. यादरम्यान दगावलेल्या ३० जणांपैकी कल्याण तालुक्यातील तीन, अंबरनाथमधील सहा, एक शहापूर, भिवंडी इमारत दुर्घटनेसह या तालुक्यातील १९ आणि ठाणे शहरातील एकाचा या पावसाळ्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे. या पावसाळ्यात ३३ व्यक्ती जखमी झाल्या असून चार जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसाच्या कालावधीत १३ घरे पडली असून ९७ घरे बाधित झाली आहेत. तीन मोठमोठ्या बांधकामांना या पावसाची झळ बसली आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाचे ३० बळी
By admin | Updated: September 12, 2016 03:11 IST