ठाणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी एक तासभर ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. अचानक जोरदार सरी कोसळल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. सप्टेंबर महिन्यात पावसाचा लपंडावाचा खेळ सुरू आहे. कधी अचानक कोसळणे तर कधी मोठी विश्रांती घेणे असा पावसाचा खेळ ठाणेकर अनुभवत आहेत. मंगळवारी मात्र ठाणेकरांना दुपारच्या सुमारास पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळाले. सकाळी शहरात ऊन पडले होते. पावसाची कोठेही चिन्ह दिसत नव्हती. दुपारी १२ वाजल्यापासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली दुपारी १२.३०च्या सुमारास पावसाने जोर धरला दुपारी दीड वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. पावसाचा जोर पाहून दिवसभर हा पाऊस थांबणार नाही असाच काहीसा समज झाला होता. परंतु दुपारी दीड नंतर पावसाने विश्रांती घेतली व त्यानंतर पुन्हा लख्ख पडलेल्या उन्हामुळे उकाडा वाढला. या एक तासात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. गणपतीचे शेवटचे दोन दिवस राहिल्याने दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा मात्र या पावसामुळे गोंधळ उडाला आणि सर्वत्र धावधाव झाली.
ठाण्यात एक तासात ३० मि.मी. पावसाची नोंद
By admin | Updated: September 14, 2016 04:24 IST