- भाग्यश्री प्रधान, ठाणेकुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. जिल्हा पोलीस मुख्यालयात व आयुक्तालयात ध्वजारोहण करतांना आणि ध्वज उतरविताना तीन कॉन्स्टेबल एक हवालदार आणि एक पोलीस उपस्थित असतात. ते राष्ट्रध्वजाला यावेळी मानवंदना देतात. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय आदी शासकीय कार्यालयातही दोन कर्मचारी हे काम करतात. ध्वज ज्या दोरीच्या आधारे फडकविला जातो ती दोरीही कॉटनचीच असते. ३० फुट लांबीच्या ध्वजस्तंभासाठी सुताची ६० फुट लांब दोरी वापरली जाते. ध्वज बांधण्यासाठी ध्वजाची शिलाई करतानाही ही दोरी ध्वजाशी जोडली जाते. ध्वज खांबावर टोकाशी असणाऱ्या लाकडी फिरत्या चकतीच्यामध्ये ही दोरी ठेवली जाते आणि त्यानंतर त्या ध्वजाच्या दोरीलाच मुख्य दोरी जोडून ध्वज चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी तिचा वापर केला जातो. हा ध्वज उतरविल्या नंतर तो जमिनीला लागणार नाही अशा रितीने त्याची घडी घालून ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदीरीही सामान्य प्रशासन खात्याकडेच असते. या तिरंग्याची रचना मच्छलीपट्टणम येथे जन्मलेल्या पिंगी व्यंकैय्या यांनी केली आहे. त्यातील भगवा(केशरी) रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतिक आहे तर हिरवा रंग समृध्दीचे प्रतिक असल्याचे मानले जाते. मधल्या पांढऱ्या पट्टयावर असलेले अशोकचिन्ह हे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असणाऱ्या सिंहमुद्रेवर असणाऱ्या अशोकचक्रासारखे आहे. जीवन गतीमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असेही हे अशोकचक्र दर्शविते. हे चक्र सागराची अथांगता, कालचक्र आणि त्याचबरोबर बदलत जाणारे जग सूचित करते, असा या राष्ट्रध्वजाचा अर्थ तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला ६८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या तिरंग्याचा सन्मान व्हावा यासाठी अनेक संस्थाही कार्यरत आहेत.
अशी आहे रोहावरोहणाची ध्वजसंहिता
By admin | Updated: August 11, 2015 23:53 IST