भिवंडी : मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात ३६ जणांची धरपकड केली. रात्री उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. आधी कमानी उभारू देण्याबाबत कोणताच आक्षेप न घेणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाने या तणावानंतर कमान उभारणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले. शांतता कमिटीच्या बैठकीनंतरही तणाव कमी न झाल्याने गायत्रीनगर, रामनगर भागात दुसऱ्या दिवशी घबराटीचे वातावरण होते.दोन गटातील दगडफेक, पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या घटनांनुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. रामनगर भागातील मन्सूरबाग व फातमानगरमधील ताबुतांची मिरवणूक काढल्यावर ते ठंडा (दफन) करण्यासाठी चिस्तीया मशिदीकडे नेले जातात. ती मिरवणूक गायत्रीनगरच्या सिध्देश्वर श्ांकर मंदिरासमोर आली असता मिरवणुकीतील जमावाने मंदिरावर दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक केली. नवरात्रोत्सवाची स्वागत कमानी तोडल्याने त्यावरील दुर्गादेवीचे चित्र असलेले बॅनर जमिनीवर पडून पायदळी तुडवले गेले. त्यातून धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
भिवंडीतील ‘त्या’ भागात तणावच
By admin | Updated: October 15, 2016 06:24 IST