मीरा रोड : मीरा रोडच्या पेणकरपाडा येथील सरकारी जमीन व कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा जय भवानीनगरवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले हाेते. मात्र या ठिकाणी महापालिकेने चक्क नळजोडणी दिली आहे. पालिकेने ही जाेडणी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल करत नगरसेवक परशुराम म्हात्रे यांनी तक्रार केली आहे.
कांदळवन व सरकारी जागेत होणाऱ्या अतिक्रमणांना मालमत्ता कर आकारणी, नळजोडणी आदी सुविधा न देण्याबाबत महसूल विभागाने मीरा भाईंदर महापालिकेस सतत पत्रे दिली आहेत. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी ३ मार्चला पेणकरपाडा येथील जय भवानीनगरला नळजोडणी दिली आहे. शिवाय, मालमत्ताकर आकारणीही करून दिली आहे. वास्तविक जय भवानीनगर हे बेकायदा असून तेथे सरकारी जागेवर अतिक्रमण झाले आहे. कांदळवन क्षेत्रात हे बेकायदा बांधकाम झाले असून महसूल विभागाने याआधीही या बांधकामांवर कारवाई केली होती. नगरसेवक म्हात्रे यांनी नळजोडणी दिल्याप्रकरणी पालिकेस पत्र लिहिले आहे. उच्च न्यायालयाने या बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. पण कारवाई न करता उलट नळजोडणी, करआकारणी आदी सुविधा पालिका देत आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे.