डोंबिवली : निळजे गावातील व्यावसायिक सतीश रसाळ (४२) यांची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी त्रिकुटाला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे सतीश यांची हत्या त्यांचाच चुलतभाऊ जयदीप जयराम रसाळ (३८), चंदन गायकवाड आणि त्यांच्या अन्य एका वृद्ध साथीदाराने मिळून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयातून सतीशची हत्या केल्याची कबुली जयदीपने दिल्याचे समजते.कल्याण-शीळ रोडवरील पिंपळेश्वर पॉइंट हॉटेलसमोर शुक्र वारी सकाळी एका गाडीत एक तरु णाचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान तो सतीश रसाळ यांचा असल्याचे उघड झाले. त्यांचा काटई टोलनाका येथे जेसीबी, बांधकाम साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. या हत्येच्या तपासासाठी स्थानिक मानपाडा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके तपास करत होती.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने कसोशीने शोध घेऊन तीन दिवसांत आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी जयदीप सतीशचा चुलत भाऊ आहे. आपल्या पत्नीवर सतीशची वाईट नजर असल्याच्या संशयातून जयदीपने चंदन आणि अन्य वृद्ध साथीदाराच्या मदतीने सतीशची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर, त्याचा मृतदेह गाडीत ठेवून पळ काढला. पोलिसांनी आरोपींना सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले. मात्र, तपशील समजू शकला नाही. (प्रतिनिधी)
चुलत भावानेच केली सतीश रसाळची हत्या
By admin | Updated: September 13, 2016 02:31 IST