ठाणे : वारंवार सूचना देऊनही धोकादायक इमारतींमधील रहिवासी इमारत खाली करण्यास तयार नसल्याने आता हतबल पालिकेने या इमारतींचा कुठलाही भाग कललेला किंवा वाकलेला दिसला तर न चुकता कळवा, असे आवाहन केले आहे. यामुळे धोकादायक इमारत अगदी पडण्याच्या स्थितीत आली तर त्या वेळी तरी रहिवाशांना बाहेर काढून जीवितहानी टाळता येईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वेळोवेळी नोटिसांद्वारे इमारत राहण्यास योग्य नसल्यास ती रिकामी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल आॅडिटही करण्यास सांगितले आहे. परंतु, असे असूनही वर्षानुवर्षे काही इमारतींमधील रहिवासी इमारती रिकामी करण्यास तयार होत नसल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे आता या इमारतींत राहणाऱ्या नागरिकांना इमारतीच्या रचनेत अथवा सुरक्षेबाबत काही बदल आढळल्यास त्यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची माहिती द्यावी अथवा १८००२२२१०८ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन आता पालिकेने केले आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारतधारकांना इमारतीच्या आरसीसी फ्रेम, कॉलम, बिम, स्लॅब आदींच्या रचनेत बदल झाला असल्याचे आढळले तर त्याची माहिती द्यावी, इमारतीचे कॉलम अथवा बिम झुकल्यासारखे दिसल्यास, इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचू लागल्यास, कॉलममधील काँक्रिट पडत असल्यास, जॉइंटमध्ये भेगा पडल्याचे आढळल्यास माहिती तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही इमारत तत्काळ रिकामी करावी तसेच आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांनासुद्धा सतर्क राहण्यास सांगावे. तातडीने तज्ज्ञ आरसीसी सल्लागारांंना दाखवून प्रॉब्ज (टेकू) लावण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. यामुळे निदान जीवितहानी तरी टळेल, अशी पालिकेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
हट्टी रहिवाशांपुढे पालिकेने टेकले गुडघे
By admin | Updated: September 13, 2016 02:28 IST