ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ कोटी उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांच्या बिलांचा भार शासनाने उचलावा, असा जीआर असताना अंबरनाथ आणि कल्याणच्या ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांची जोडणी कापण्यात आल्याचे शिंदे यांनी या वेळी निदर्शनास आणले. ज्या ठिकाणी पथदिव्यांची आवश्यकता आहे, तिथे तातडीने ते उभारण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. दिव्यामध्ये ४५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ठाण्यापुढील या संपूर्ण परिसरातील वीजसमस्या सोडवण्यासाठी ७ जुलै रोजी कल्याण येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना दिले. अंबरनाथ येथील पाले विद्युत उपकेंद्राकरिता एमआयडीसीकडून जीआयएस योजनेंतर्गत ६ हेक्टर जागा तातडीने हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असून उल्हासनगर येथील लाललोई स्विचिंग स्टेशनकरिता ऊर्जा विभागाच्या नवीन धोरणानुसार आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बावनकुळे यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांना दिले. दिवा येथे स्विचिंग स्टेशनची आवश्यकता असल्याने ठाणे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ते बांधण्याची तयारी ऊर्जामंत्र्यांनी दाखवली. तसेच, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन खारेगाव येथे स्वतंत्र विभाग करण्यासही त्यांनी तत्त्वत: मंजुरी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. दिव्यासाठी स्वतंत्र उपविभाग निर्माण करण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
कल्याण, डोंबिवली, दिव्यात वीज सक्षमीकरण
By admin | Updated: July 11, 2016 02:05 IST