लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येत्या १५ आॅगस्टपर्यंत सर्वंकष तसेच फेरीवाल्यांच्या सर्वच घटकांना सामावून घेणारे राज्यात आदर्श ठरेल, असे फेरीवाला धोरण तयार केले जाईल, असा दावा आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. याबाबत नगरसेवकांसह सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक धोरण कसे तयार करता येईल, याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वंकष आणि आदर्श असे फेरीवाला धोरण बनविताना केंद्रीय फेरीवाला धोरणाबरोबरच अजून कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल, जेणेकरून सर्व घटकांना समाविष्ट करून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न सोडविता येईल, याबाबत आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्या बैठकीत त्यांनी फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्याच्या संदर्भात व्यापक चर्चा केली. सोमवारी झालेल्या या बैठकीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात किती फेरीवाल्यांना परवानगी देता येणे शक्य आहे, त्याचबरोबरच त्यांच्यासाठी जागा निश्चित करणे, निश्चित केलेल्या जागेच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा, पार्किंगची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रत्येक प्रभाग समितीमध्ये त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणे आदी गोष्टींवर चर्चा केली. त्याचबरोबर प्रत्येक ठराविक अंतरानंतर भाजीपाला, फळे, फुलवाले आणि त्यानंतर खाद्यपदार्थवाले यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची शक्यता करणे व्यक्त करून त्यासाठी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. मोठ्या गृहसंकुलातंर्गत भाजीवाले, फळवाले किंवा इतर फेरीवाल्यांना समाविष्ट करता येईल जेणेकरून त्या गृहसंकुलातील रहिवाशांना भाजीपाला, फळफळावळ तसेच इतर वस्तू विकता येतील का याचीही शक्यता पडताळण्यात येणार असून याबाबत संबंधित गृहसंकुलांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.महापालिका क्षेत्रात आरक्षित भूखंड, खुली मैदाने, सुविधा भूखंड, तलावांचा परिसर, शाळांची मैदाने, ज्या ठिकाणी रस्ता संपला आहे ती जागा आदी ठिकाणे फेरीलावाल्यांसाठी ठराविक वेळेसाठी उपलब्ध करून देता येतील का या विषयीही आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर रस्ते किंवा फुटपाथ ही ठिकाणे मर्यादित वेळेसाठी फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून देता येईल का याबाबतही सर्वांना विश्वासात घेऊना निर्णय घेण्याबाबतचे सुतोवाच त्यांनी केले. दरम्यान धोरण आणि आराखडे तयार होत असतानाच फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची आणि त्यांचे सांकेतिक क्र मांक तयार करण्यात यावेत. ते फेरीवाल्याच्या व्यवसायानुसार असावेत जेणेकरून ज्याचा सांकेतिक क्र मांक आहे आणि त्याला कोणत्या ठिकाणी जागा निश्चित केली आहे हे समजेल अशा सूचना देतानाच या ओळखपत्राचा गैरवापर झाल्यास संबंधितावर कठोर करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ३ महिन्यांत?
By admin | Updated: May 23, 2017 01:37 IST