ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा दोन घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटी घातलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. येत्या ५ सप्टेंबरपर्यंत सरकारने गणेशभक्तांना नियमात मुभा न दिल्यास ६ तारखेला रेलरोको करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघाने बुधवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी राजू कांबळे, सुजित लोंढे,दर्शन कासले,संभाजी ताह्मणकर यावेळी उपस्थित होते.
मागील वर्षी कोरोनामुळे चाकरमान्यांना कोकणात किंवा गणेशोत्सवासाठी गावी जाता आले नव्हते. त्यामुळे यंदा कोरोना काहीसा ओसरू लागल्यानंतर अनेकांनी तीन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण केले. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला कोकणात गावी जाता येणार अशा आनंदात असतानाच २३ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने नवीन अटी व नियम लादले. कोकणात जाणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक केल्याने कोकणवासीयांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले आहे.