ठाणे : येत्या चार वर्षांत मेट्रो रेल्वे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेस भेट दिली. कारशेडकरिता २०० एकर जमिनीची आवश्यकता असून सध्या त्यापैकी बहुतांश जमीन मोकळी असतानाच जमीन संपादन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सेठी यांनी सांगितले. मात्र सध्या या जमीन संपादनाला स्थानिक शेतकरी व आदिवासी यांनी विरोध केला आहे.कारशेडच्या पाच ते सात टक्के जमिनीवर १२ ते १५ बंगले, फार्म हाऊस उभे आहेत. याखेरीज काही किरकोळ घरे आहेत. आदिवासी व शेतकरी यांच्या मालकीची ही जमीन आहे. शिवाय काही बांधकाम व्यावसायिकांनी स्थानिकांसोबत जमीन खरेदीचे करार-मदार केल्याची चर्चा आहे. या सर्वांना पुरेसा मोबदला देऊनच जमीन संपादन झाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेठी यांच्याकडे केली. नाट्यसंमेलनानिमित्त येथे आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना सरनाईक यांनी मेट्रोची प्रतिकृती दिली होती. याच विषयावर किमान डझनभर लक्षवेधी सरनाईक यांनी विधानसभेत मांडल्या आहेत. त्याची दखल घेत फडणवीस यांनी सेठी यांना तात्काळ येथे धाडले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सरनाईक आणि नगरसेवक संभाजी पंडित यांनी कासारवडवली व ओवळा येथील या जागेची पाहणी केली. (प्रतिनिधी)निवडणुकीवर डोळामेट्रो प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र त्याचा श्रीगणेशा पुढील वर्षींपूर्वी व्हावा, असा शिवसेना व भाजपाचा आग्रह आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी महापालिका निवडणुका असून तत्पूर्वी जमीन संपादन काही अंशी झाले असले तरी त्या भरवशावर महापालिका निवडणूक जिंकण्यास हातभार लागेल, असे दोन्ही पक्षांना वाटते.
कारशेडच्या भूखंडावर फार्म हाऊस
By admin | Updated: February 24, 2016 03:07 IST