डोंबिवली : एमआयडीसी मिलापनगरमध्ये शनिवारी काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खणण्यास सुरुवात झाली. मध्यंतरीच्या काळात हे काम बंद होते, पण ऐन पावसाच्या तोंडावर हे काम पुन्हा सुरू केले असून, त्यामुळे रस्ताही वाहतुकीस बंद ठेवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ऐन पावसाळ्यात खोदकाम करू नये असे निकष असताना अचानक तातडीने कामे का एमआयडीसी करते? आधीच एमआयडीसीमधील रस्ते खराब झाले असताना भर पावसात रस्त्याच्या मधोमध असे खड्डे खणणे कितपत योग्य आहे, जर जलवाहिनी टाकण्याचे काम अत्यावश्यक होते, तर मे महिन्यात हे काम पुरे करायला पाहिजे होते. हीच कामाची तत्परता इतर कामात पण एमआयडीसीने दाखवावी. याची तक्रार रहिवाशांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.