डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडी पुलाच्या कामाचे भूमीपूजन होऊन पाच महिने उलटले तरी अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. पुलासाठी सीआरझेडमधील जमीन संपादनचा अडसर कायम आहे. या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव केडीएमसीने एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या बाबत गुरुवारी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्याकडे बैठक झाली. त्यात सीआरझेड जमीन संपादनाविषयी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल, असे दराडे यांनी स्पष्ट केले.एमएमआरडीएतर्फे २२६ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या सहा पदरी पुलाच्या कामाचे भूमीपजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१६ ला झाले. याच कामाच्या भूमिपूजनावरून शिवसेना-भाजपा आमने सामने आली होती. मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमीपूजन होण्यापूर्वीच शिवसेनेने त्याचे भूमीपूजन करून राजकीय धुराळा उडवून दिला होता. या कामाचे भूमीपूजन होऊन पाच महिने झाले तरी अद्याप कामाला एक इंचही सुरुवात झालेली नाही. पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य येऊन पडले आहे. मात्र, पुलासाठी डोंबिवलीकडील ठाकुर्ली मोठागावची जागा व पुलाच्या पलिकडे भिवंडी भागातील जागा अद्याप संपादित झालेली नाही. काही जागा ही सीआरझेडमध्ये येते. शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केला आहे. जमीन संपादित केलेली नसताना कामाचे भूमीपूजन लवकर उरकले गेले. त्यामुळे काम रखडले आहे. महापालिका आयुक्तांनी जमीन बाधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. बाधितांना मोबदला हवा आहे. आयुक्तांच्या मते बाधितांनी प्रथम जमीन द्यावी. मग मोबदल्याचा विचार केला जाईल. तर एमएमआरडीएच्या मते आम्ही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. कंत्राटदार नेमला आहे. जमीन संपादन हा भाग महापालिकेचा आहे. (प्रतिनिधी)
‘सीआरझेडच्या जागेसंदर्भात निर्णय घ्या’
By admin | Updated: March 14, 2017 01:34 IST