सुरेश लोखंडे, ठाणेसाथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच जिल्ह्यात तापाचे सुमारे ४१३ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ ठिकाणच्या साथीच्या उद्रेकांमध्ये ३०८ डेंग्यूची तर हिवतापाचे १०५ रूग्ण आहेत. यात सुमारे आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जुलै ते ७ सप्टेंबरपर्यंत सुमारे दहा ठिकाणी साथीचा उद्रेक झाला. यामध्ये ३०१ रूग्ण तर मे मध्ये भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रात उद्भवलेल्या साथीमध्ये सात रूग्ण आढळले. त्यांचे रक्त नमुने घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या कालावधीतील आॅगस्टमध्ये पाच जणांचा तर १० सप्टेंबरपर्यंत तीन रूग्ण दगावले आहेत. सध्या जिल्ह्यात सार्वजनिक उत्सवांची रेलचेल सुरू आहे. त्यात गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, विषमज्वर आणि डेंग्यूची साथ डोके वर काढू पहात आहे. यामुळे विविध स्वरूपाच्या तापाने जिल्हा फणफणत असतानाच डेंग्यू या जीवघेण्या आजाराने जिल्ह्यातील सुमारे ३०१ रूग्ण त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यास अनुसरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस सोनावणे यांना विचारणा केली असता, जलजन्य साथीचे आजार आटोक्यात असून जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी डेंग्यूचे संशयित आढळण्याचे प्रमाण वाढल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. कल्याण तालुक्यातील आजदे गावाजवळील पिसवली टाटा पॉवर जवळच्या वस्तीत उद्भवलेल्या साथीमध्ये १४२ रूग्ण, अंबरनाथ तालुक्यातील वडवली येथील साथ उद्रेकात २४, शिवबसव नगरमध्ये १२, सेक्शन अंबरनाथमध्ये १०, शास्त्री नगरमध्ये ४७, ठाणे महापालिकेच्या मानपाडा परिसरात चार, मिरा भार्इंदर मनपाच्या शांतीनगरमध्ये नऊ, सुभाषनगर, शक्ती टॉवर येथे १५, भिवंडी तालुक्याच्या दळेपाडा येथे ३८ आणि कल्याण डोंबिवली मनपाच्या माढवी येथे साथीचा उद्रेक झाल्याचे उघड झाले आहे. यापैकी मनपा क्षेत्रात केवळ दहा तर नगरपालिका क्षेत्रात केवळ चार रूग्ण आणि ग्रामीण भागात दोन असे केवळ १२ रूग्ण डेंग्यूचे असल्याचा निर्वाळा ताप उद्रेकाच्या वर्गीकरण अहवालात नमूद केले आहे. परंतु जिल्ह्यातील वास्तवस्थिती लक्षात घेता ३०० पेक्षा अधिक रूग्ण डेंग्यूने त्रस्त असून त्यांची नोंद अहवालात घेण्यास विलंब होत आहे. ४टोकावडे येथील माजी सरपंच शांताराम पवार यांचा नातू वैभव पवार याला डेंग्यूची लागण झाली असून त्याला कल्याण येथील खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे. गावात आणखी एक-दोन रु ग्ण या आजाराने बाधीत असल्याचे समोर येत आहेत परंतु शासकीय दवाखान्यात उपचार होत नसल्याने या रु ग्णांना महागड्या खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. ४यामुळे डेंग्यूच्या आजारावर सर्व शासकीय रु ग्णालयात उपचाराच्या सुविधा निर्माण करून डासांचा उपद्रव रोखण्यासाठी औषध फवारणीची मागणी पंचायत समिती सदस्या पद्मा गायकर व मुरबाड मनसे शहर प्रमुख नरेश देसले यांनी केली आहे. या बाबत प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांचेकडे चौकशी केली असता त्यांना या बाबत कोणतीही कल्पना नव्हती.शहापुरात मलेरियाबरोबरच डेंग्यूचे देखील ३ रुग्ण आढळून आले आहेत तर ४ संशयित असल्याची शासकीय आकडेवारी आहे. तालुक्यातील धोंडाळपाडा येथील उत्तम खंडागळे (३३) चिंतामण खंडागळे (५५) व चेरवली येथील जागृती फर्डे (१८) यांना डेंग्यू झाला आहे. तर ४ संशयितदेखील आढळले आहेत. जुलै महिन्यात १ आॅगस्टमध्ये २ तर सप्टेंबरमध्ये ३ अशी डेंग्यू रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबरच कल्याण डोंबिवली येथीली खाजगी रुग्णालयात व शहापूर तालुक्यात ४ ते ५ रुग्ण उपचार घेत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र टाकीपठार २, किन्हवली ५, शेणवा ७, डोळखांब ३, कसारा ९, वासिंद १३, शेंद्रूण ५, अघई १०, टेंभा ३ असे अनुक्रमे मलेरियाचे ५७ रुग्ण आॅगस्ट अखेरीस आढळले आहेत. खाजगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्यांनी २४ तासाच्या आत शासकीय आरोग्य यंत्रणेस कळविणे बंधनकारक आहे.
ठाणे जिल्ह्याला डेंग्यूचा ‘ताप’
By admin | Updated: September 25, 2015 02:18 IST