भिवंडी : बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या कुर्बानीनंतर जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाणीच्या साफसफाईबाबत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा महापौरांच्या मध्यस्थीनंतर मावळला. गेल्या तीन-चार दिवसांपासून मनपा प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये धुसफूस सुरू होती. या प्रकरणी सोमवारी दुपारी महापौर तुषार चौधरी यांनी कामगार संघटनांशी चर्चा केल्याने मंगळवारपासून बकरी ईदची सफाई करण्याची तयारी कामगारांनी दर्शवली. त्यामुळे ईदच्या आयोजनातील अडथळे दूर झाल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील शहर सफाई सोडता अन्य सर्व कामे ठेकेदारामार्फत करण्यात येतात. त्यामुळे बकरी ईदनिमित्ताने होणाऱ्या कुर्बानीनंतरचा जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाण वाहून नेण्यासाठी ठेकेदार नेमावेत, अशी मागणी कामगार संघटनेने प्रशासनाकडे गेली दोन वर्षे सुरू केली आहे. मात्र, प्रशासनाने विविध कारणे पुढे करीत कुर्बानीनंतरची स्वच्छता सफाई कामगारांकडूनच सुरू ठेवल्याचा आरोप करीत संघटनांनी प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. दैनंदिन सफाई ही सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी असून अत्यावश्यक सेवा म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, तर शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. कामगारांनी स्वच्छतेचे काम केले नाही, तर त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत फौजदारी कारवाई करण्याची नोटीस दिल्याने प्रशासन व कामगार संघटनांमध्ये तणावाचे वातावरण होते. ईदच्या सणात व्यत्यय येऊ नये, म्हणून महापौर तुषार चौधरी यांनी मध्यस्थी केली.कुर्बानी केंद्रावर व इतर ठिकाणी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम केल्यास दिलेली नोेटीस मागे घेण्यात येईल, असे पत्र कर्मचारी संघर्ष कृती समितीला दिले. त्यानंतर, कामगार व प्रशासनातील वातावरण निवळले आणि सफाईप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत कर्मचाऱ्यांनी बकरी ईदच्या काळात सफाईचे काम करण्याचे संघटनांनी मान्य केले. (प्रतिनिधी)
कुर्बानीनंतर स्वच्छता होणार
By admin | Updated: September 13, 2016 02:18 IST