विक्रमगड : गेल्या महिन्यात १२ आणि या महिन्यात खोच ग्रामपंचायत मधील सागर वाघ, ईश्वर सवरा या दोन बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर आता खासदार वनगा यांनी या दोघांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी धाव घेतली असून मुख्यमंत्रीही या परिसराचा दौरा लवकरच करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. निष्पाप दोन बालकांचा एका आठवड्यात कुपोषणाने झालेला मृत्यू, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यानी त्याकडे फिरवलेली पाठ, या प्रश्नावर श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, बालमृत्यू, कुपोषण याचे लोकमतने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात हे घडले तरी त्यांनी या परिसरला भेट देण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. प्रशासनही मुर्दाडासारखे वागले. यामुळे संतप्त झालेल्या जनभावना ओळखून मुख्यमंत्री या परिसराचा दौरा करणार असल्याचे समजते.शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सभापती सारिका निकम व यांनी सागरच्या कुटुंबीयांना मदत केली तर ईश्वरच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले त्याचबरोबर पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा यांनीही सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अन्नधान्य आणि रोख रकमेची मदत केली असून मोखाडा रुग्णालयात बालरोगतज्ञ स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती लवकरच होणार असल्याचे लोकमतला सांगितले. या महिन्यात कुपोषणाचे दोन बळी गेल्यानंतरही या पालकमंत्री विष्णू सवरा आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत अजूनही फिरकलेले नाहीत. त्यामुळे येथील जनभावना संतप्त आहेत. (वार्ताहर)
मुख्यमंत्री करणार खोच गावाचा दौरा
By admin | Updated: September 13, 2016 02:03 IST