बदलापूर : शिवसेना आणि भाजपा यांच्यात उपनगराध्यक्षपदावरुन जुंपलेली असतांना आता या वादात विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. उपनगराध्यक्षपद न मिळाल्याने स्वाभिमान दुखावल्याचे कारण पुढे करीत भाजपाने सभापतीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याचवेळी मागच्या दाराने उपनगराध्यक्षपदा करिता शिवसेनेबरोबर भाजपाच्या वतीने बोलणी सुुरुच आहेत. यावरुन भाजपाने उपनगराध्यक्षपदासाठी आपला स्वाभिमान सेनेपुढे गहाण घालत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी केली आहे. आठवडाभरापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात उपनगराध्यक्षपदावरुन राजकीय तांडव सुरु आहे. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपा आग्रही असल्याने त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा देत शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर सुरु केला होता. शिवसेना आणि भाजपा यांच्यात विधानपरिषद निवडणुकीदरम्यान सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपद देण्याबाबत करार झाला होता. भाजपाला अडीच वर्षे उपनगराध्यक्षपद देण्याचे ठरलेले असल्याने आॅगस्टमध्ये हे पद भाजपाला मिळणे अपेक्षित होते. मात्र शिवसेनेने भाजपा विरोधाची भूमिका घेत हे पद देण्यास चालढकल सुरु केली आहे. विरोधाची भूमिका बाजूला ठेऊन सत्तेत यावे, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर भाजपाने दबाव तंत्राचा वापर करीत त्यांच्या वाट्याला आलेल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. आपण सत्तेतून बाहेर पडत असल्याचा दावा स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. एकीकडे सत्तेतून बाहेर पडल्याचा दावा करतानाच दुसरीकडे भाजपाचे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडीचा मार्ग अवलंबित आहेत. मुळात भाजपा जनतेच्या नजरेत धूळफेक करीत आहे. बदलापूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्याने त्या संदर्भात पालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही या वेळी दामले यांनी केली. (प्रतिनिधी)
भाजपाने स्वाभिमान गहाण टाकला!
By admin | Updated: September 14, 2016 04:23 IST