जान्हवी मोर्ये , डोंबिवलीनिराशेच्या गर्तेत सापडल्याने आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्यांना त्यापासूून परावृत्त करण्याकरिता सुरू केलेल्या हेल्पलाइनला चार वर्षांपूर्वी दिवसाकाठी जेमतेम दोनजणांचे फोन येत होते. आता आत्महत्येचा विचार करणारे ८ जण दररोज फोन करतात. समाजातील भीषण नैराश्याचे हे वास्तव आहे. गणेशोत्सवाच्या काळात आलेल्या १० सप्टेंबर रोजीच्या ‘जागतिक आत्महत्याविरोधी दिना’चे औचित्य साधून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाणे परिसरांतील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आत्महत्या रोखण्याबाबत जनजागृती केली. ३० गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी दिलेल्या हेल्पलाइनला दूरध्वनी केले जात आहेत.डॉ. सारा दस्तुर यांनी १ मे १९९३ ला नैराश्यग्रस्तांना भावनिक आधार देता यावा, म्हणून या हेल्पलाइनची स्थापना केली. गेल्या २३ वर्षांपासून ही हेल्पलाइन सुरू आहे. तिचे आॅफिस दादरला आहे. ३ ते ९ या वेळेत ही हेल्पलाइन सुरू असते. २८ स्वयंसेवक सर्व काम पाहतात. चार वर्षांपूर्वी महिन्याला कॉल्सचे प्रमाण ७० इतके होते. आजमितीस २५० पेक्षा जास्त कॉल्स येतात. कॉल्स केलेल्यांचे समुपदेशन केले जाते. स्वयंसेवक त्याची माहिती गुप्त ठेवतात. कुठेही ओळख उघड केली जात नाही. स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. वाढलेल्या कॉल्समुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत असून आत्महत्येचा विचार वाढतो आहे, असे हेल्पलाइनवरील समुपदेशक मृणालिनी ओक यांनी सांगितले. मानसशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या व या उपक्रमात सक्रिय सहभाग असलेल्या नमिता सारंग यांनी सांगितले की, गणेशोत्सवात पथनाट्ये, बॅनर्स आणि हेल्पलाइन याद्वारे जनजागृती करण्यात आली. समाजाची जीवनशैली बदलत असल्याने काही लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. रोजच्या जीवनातील ताणतणाव वाढले आहे. परिणामी, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. समाजाचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘तो’ आत्महत्येपासून परावृत्त झाला...दादर येथील ‘समरटन्स मुंबई’ या हेल्पलाइनवर एका तरुणाचा कॉल आला. त्याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले होते. त्याचे शिक्षण नुकतेच संपले होते. त्याला नोकरी लागली होती. मात्र, ती सुमार दर्जाची असल्याचे मुलीच्या घरच्या मंडळींचे मत होेते. मुलगा मुलीचा सांभाळ नीट करणार नाही, असे मुलीच्या पालकांचे मत होते. मुलगी सुंदर होती. मुलीच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या प्रेमविवाहाला कडाडून विरोध केला. मुलीचे लग्न दिल्लीस्थित एका मुलासोबत लावून दिले. परिणामी, वैफल्यग्रस्त झालेल्या त्या तरुणाच्या मनात दिल्लीला जाऊन राडा करण्याचा विचार येत होता. तसेच तिच्याशिवाय जीवन कसे जगणार, या विचाराने तो कासावीस झाला होता. अशा भावनिक कल्लोळामुळे त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. मात्र, त्याने हेल्पलाइनला फोन केला आणि समुपदेशानंतर आत्महत्येचा विचार सोडला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून अनेकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
आत्महत्येसंदर्भात दररोज ८ कॉल्स
By admin | Updated: September 15, 2016 02:16 IST