विरार : वसई विरार परिसरातून दोन दिवसात तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुले बेपत्ता झाली आहेत. यात तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. नालासोपारा पश्चिमेकडून अब्दुल समीद बिलाल शेख(१३) हा आपल्या राहत्या घराजवळून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गायब झाला असल्याची तक्रार त्याची आई बिल्किसबानो शेख हिने केली आहे.वालीव येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महेशकुमार सिंह यांचा मुलगा ऐश्वर्य महेशकुमार सिंह (१२) हा रविवारी दुपारी एकच्या सुमारास नायगाव येथे आपल्या मित्राच्या घरी गेला होता. मात्र, तो घरी परतला नसल्याने वालीव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी वसई पूर्व येथून प्रमिला अनंतकुमार पाठक(१५) ही शेजारीच राहणाऱ्या साकीर अन्सारी(११) हिच्या सोबत नाक्यावरून गणपतींसाठी फुलांचा हार आणण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता गेली होती. त्या दोघी पुन्हा परतल्याच नाहीत. म्हणून प्रमिलाची आई गीता अनंतकुमार पाठक हिने वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नालासोपारा पूर्वेकडे राहणारी रविना सॅलियन (१४) ही सोमवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिची आई ममता हिने तुळींज पोलीस ठाण्यात दिली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगाशी नाका येथील प्रकाश शंकरलाल तेली (१६) हा बेपत्ता झाल्याची तक्रार शंकरलाल तेली यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. विशेष सर्व बेपत्ता मुले शाळेत शिकणारी आहेत. (वार्ताहर)
वसईतून ६ विद्यार्थी बेपत्ता
By admin | Updated: September 14, 2016 04:16 IST