सुरेश लोखंडे , ठाणेजीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे सहा दिवसांच्या पाणीपुरवठा अहवालाद्वारे उघड झाले आहे. हे नेमके गेले कुठे, याचा हिशेबच मिळत नाही.‘जल निर्जल तैसे... वापरावे अमृत जैसे!’ या संत महात्म्यांच्या तत्कालीन वाक्याची तंतोतंत अनुभूती येत आहे. पाण्याचा वापर करताना सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. एक दिवसाआड येणाऱ्या पाण्याची ‘चातका’प्रमाणे गृहिणी वाट पाहत असतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी आता विविध उपाय हाती घेतले. मात्र पुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडून पाण्याच्या बचतीसह चोरी, गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे आढळले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना बारवी धरणासह आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे पुरवले जात आहे. ६ ते ११ मे या सहा दिवसांच्या कालावधीत बारवी धरणातून दोन हजार ९५० दशलक्ष लीटर व तीन हजार २५९ दशलक्ष लीटर पाणी आंध्रातून उचलण्यात आले आहे. या सहा हजार २०९ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर एमआयडीसी, स्टेम, केडीएमसी आणि एमजेपी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी केला आहे. जिल्ह्यातील या चार यंत्रणांनी सात दिवसांत पाच हजार ७५३.२५० दशलक्ष लीटर पाण्याचे वितरण केले आहे. परंतु, धरणातून उचललेल्या आणि या यंत्रणांनी वितरीत केलेल्या पाण्याच्या हिशेबामध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
४५० एमएलडी पाणी बेपत्ता
By admin | Updated: May 15, 2016 03:53 IST