लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कृषिपंप ग्राहक वगळता, इतर सर्व वीज ग्राहकांकडून त्यांच्या चालू वीजबिलासह थकबाकीचे एकूण ९९२ कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु मार्चचे शेवटचे १० दिवस शिल्लक असताना ४३६ कोटी रुपयांची वसुली बाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील आठ लाख ८० हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे ३७५ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम आणि अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी वसुली मोहिमेत सहकार्य करावे व भरणा केंद्रात वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या कल्याण कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मोहीम व त्यासोबतच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू आहेत. परिमंडळातील वीज ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई आणि पालघर या चार मंडळात सर्व वर्गवारीतील जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. १९ मार्चपर्यंत कल्याण परिमंडळातील सात लाख ५८ हजार ग्राहकांनी त्यांच्या १५२ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमाद्वारे केला आहे. कोरोनाचा पुन्हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमाद्वारे घरबसल्या वीजबिल भरावे व सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
------------------------