डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांवर पाेहाेचली आहे. सर्वच वर्गवारीतील सुमारे दहा लाख ग्राहकांकडे ५५२ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण परिमंडळांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या १७३१ वीजजोडण्यांचे १२४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर परिमंडळात शहरी भागातील पथदिव्यांच्या २०१७ वीजजोडण्यांचे ५१ कोटी रुपयांचे वीजबिल येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या १०३१ वीजजोडण्यांची थकबाकी चार कोटी ४० लाखांवर गेली आहे. दोन्ही सार्वजनिक सेवांचे थकीत वीजबिल भरून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा. अन्यथा, या सेवांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक नऊ लाख ९९ हजार ग्राहकांकडे ४४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
-----