भीमानगर : पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यातील पाऊस बंद झाल्याने दौंडमधून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात धरणात केवळ एक टक्का पाण्याची पातळी वाढली असून आता धरण ८१ टक्के भरले आहे.
पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण हे आता पुणे जिल्ह्यातील धरणावरच भरत आहे. चालू वर्षी उजनी जलाशयावर ३८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. गेल्या वर्षी उजनी धरणावर एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाळा संपायला काही दिवस शिल्लक असताना अद्यापही उजनीवर पाहिजे तसा दमदार पाऊस झालाच नाही.
पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली असून ओव्हरफ्लो पाणी सोडून दिले जात असल्याने उजनीची टक्केवारी वाढत आहे. सद्य परिस्थिती पाहता असाच फ्लो येत राहिला तर उजनी ९० टक्केचा पल्ला गाठेल.
दरम्यान, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बंडगार्डन व दौंडचा विसर्ग निम्म्यावर आला आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात तीन टक्क्यांनी पाणीवाढ झाली आहे.
................
उजनी सद्य:स्थिती
एकूण पाणीपातळी ४९५.९०० मीटर
एकूण पाणीसाठा ३०१९.८७ दलघमी १०६ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा १२१७.०६ दलघमी ४३ टीएमसी
टक्केवारी ८१ टक्के
........
उजनीत येणारा विसर्ग
दौंड ८११६
बंडगार्डन ५०००
.........
उजनीतून जाणारा विसर्ग
सीनामाढा २२२
दहिगाव ८४
बोगदा १५०