सोलापूर : जिथे विद्रोह नाही तिथे समाज घडत नाही आणि जिथे विद्रोह आहे तेथील समाजात सुधारणा होत असते, त्यामुळे विद्रोहाला आणि विद्रोही साहित्याला मोठे महत्त्व आहे. अशा विद्रोही साहित्यिकांचे आणि वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे अतिशय कठीण काम करणाऱ्या समाजसेवकांचे पुरस्कार देऊन गौरव करताना मला आनंद होत आहे, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज केले.डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर आणि सुशील रसिक सभा यांच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसेवा पुरस्कार आणि समाजसेवा पुरस्कारांचे आज शिंदे यांच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यंदा हा साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांना तर समाजसेवा पुरस्कार डॉ. प्रवीण पाटकर यांना प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णुपंत कोठे, पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी आमदार रामदास फुटाणे, प्रा. विलास बेत, दत्ता गायकवाड, रविकिरण पोरे, बाबुराव मैंदर्गीकर, महेश कोठे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, आज माणूस माणसाला संपवत चालला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पिढीला चिंतन करण्याची गरज आहे. समाज बदलत जातो तसे समाजाचे इंटरप्रिटेशनही बदलत जाते. त्यामुळे साहित्यासह पुराणग्रंथही आताच्या पिढीने डोळे झाकून स्वीकारू नये. विद्रोहातून क्रांती होते हे रशियाने दाखवून दिले आहे. त्यामुळे उद्याचा समाज जातीविरहित, धर्मविरहित निर्माण व्हावा ही अपेक्षा आहे.सत्काराला उत्तर देताना डॉ. कसबे म्हणाले की, ज्यांच्याशी तीस वर्षे माझे घनिष्ठ संबंध होते त्या निर्मलकुमारांच्या नावाचा पुरस्कार मला त्यांच्याच शिष्याच्या हातून मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराला माझ्या जीवनात विशेष महत्त्व आहे. समाजव्यवस्थेविषयी बोलताना ते म्हणाले की, जी व्यवस्था माणसाला त्याच्यातील सुप्त गुणांना प्रकट करण्याची संधी देते त्याच समाजातील व्यक्तींचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे माणसाला इतिहास घडविता येत नसतो तर प्रतिकूल परिस्थिती आणि तो काळच इतिहास घडवित असतो.प्रारंभी माजी आमदार फुटाणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर डॉ. पाटणकर यांची प्रकट मुलाखत प्रा. बेत यांनी घेतली. ज्योती वाघमारे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. ----------------------------------------------सोलापूरकरांनी मोकळीक दिली म्हणून...डॉ. कसबे यांच्या ओघवत्या भाषणामुळे कार्यक्रम लांबला; मात्र शिंदे संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबले. भाषणात त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, पूर्वी अशा कार्यक्रमांनाही यायला वेळ मिळत नव्हता; मात्र यंदा सोलापूरकरांनी मोक ळिक दिल्याने अशा कार्यक्रमांना भरपूर वेळ देता येत आहे. त्याचाही आनंदच आहे. डॉ. रावसाहेब कसबे हे साहित्यविश्वामध्ये खऱ्या अर्थाने झोतात आले ते त्यांच्या विद्रोही झोत या पुस्तकामुळे. सावस्कर आणि हिंदू-मुस्लीम धर्मावर प्रखर लेखन असलेले ही पुस्तके प्रतिगाम्यांनी जाळली आणि तेथून डॉ. कसबेंच्या साहित्याने लक्ष वेधून घेतले. दत्ता गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापुरात झालेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.----------------------------------गेल्या तीस वर्षांपासून पाटकर दांपत्य हे प्रेरणा या संस्थेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या असाह्य महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे काम करीत आहेत. मनुष्यांच्या अवैध वाहतुकीवर त्यांनी संशोधन केल. नियोजन आयोगानेही त्यांच्या संशोधनाची दखल घेतली
विद्रोह नसेल तिथला समाज घडत नाही :शिंदे
By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST