उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वच ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. प्रथम अनुसूचित जमाती संवर्गासाठी एक गाव आरक्षित केले जाणार आहे. अनु. जमातीची सर्वाधिक लोकसंख्या तळेहिप्परगा येथे असून, २०१० मध्ये हे गाव अनु. जमातीसाठी आरक्षित झाले होते. त्यानंतर मार्डीत २९६, कारंबा १६३, नान्नज १५३ व गावडीदारफळ याप्रमाणे जमातीची लोकसंख्या आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सहा गावे आरक्षित करावयाची आहेत.
१९९५ पासून आतापर्यंत पडसाळी, वांगी, शिवणी, कवठे, खेड, रानमसले व भागाईवाडी ही गावे जातीसाठी आरक्षित झाली नाहीत. यामधून अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असलेली सहा गावे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतील. त्यातील महिलांसाठी चिठ्ठीद्वारे तीन गावे निश्चित केली जाणार आहेत. भागाईवाडीत अनुसूचित जातीची संख्या सर्वांत कमी १० इतकी असल्याने या गावात जातीचे आरक्षण निघण्याची शक्यता कमीच आहे.
उर्वरित २९ गावांपैकी नऊ गावे इतर मागास (ओबीसी, नामाप्र), तर १० गावे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ओबीसीचे आरक्षण ठरविताना २०१५ मध्ये आरक्षित असलेली बीबीदारफळ, तिर्हे, मार्डी, वडाळा, शिवणी, नरोटेवाडी, बेलाटी, गुळवंची, होनसळ व एकरुख- तरटगाव ही गावे वगळली जातील, असे सांगण्यात आले.
-----ठळक दृष्टिक्षेप...
-उत्तर तालुक्यातील १८ गावे महिला, तर १८ गावे सर्वसाधारण असतील.
- बुधवारी सकाळी ११ वाजता मतमोजणी झालेल्या नूतन मराठी प्रशालेत सोडत काढण्यात येईल, असे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.
- जमातीसाठी आरक्षण काढताना आतापर्यंतची आरक्षित गावे वगळून सर्वाधिक जमातीची लोकसंख्या असलेल्या गावामधून गावच्या एकूण लोकसंख्येत अधिक टक्के असलेले गाव आरक्षित करावयाचे आहे.
- भागाईवाडीत अनुसूचित जातीचा सदस्य नसला तरी इतर जागेवर निवडून आलेलाही जातीचा व्यक्ती सरपंच होऊ शकतो, त्यामुळे भागाईवाडीचेही आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघू शकते, असे सांगण्यात आले.