मंगळवेढा : हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी एकनाथ पांडुरंग सूर्यवंशी (वय ४५) याने बॅँक व विविध पतसंस्थांकडून काढलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.तहसीलदार पुनाजी कोथेरे, पो.नि. दिलीप पाटील, तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे या त्रिसदस्यीय समितीने मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चौकशी केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. गेल्या चार महिन्यात कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मंगळवेढ्यात दोनवर गेली आहे. मयत एकनाथ सूर्यवंशी यांनी बॅँक आॅफ इंडियाकडून साडेतीन लाख, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४० हजार, एका पतसंस्थेकडून ८२ हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.सलग चार वर्षे पावसाअभावी तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शिरनांदगी तळे पाण्याअभावी कोरडे पडले होते. परिणामी कर्ज काढून पाईपलाईन केली. शेतीमध्ये उत्पादन नाही, काढलेल्या कर्जाचे व्याज मोठे होत गेले. हे कर्ज कशाने फेडायचे या विवंचनेत तो नेहमी असे. यातूनच त्यांनी आत्महत्या केली.
कर्जाला कंटाळूनच शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: August 22, 2014 00:43 IST