नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील पहिली तक्रार तहसील कार्यालयाला आली आहे. एकरुख- तरटगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड नंबर-१ मधून नसीर अहमद जहागीरदार विरोधात बळीराम सोनवणे व शाम उडाणशिवे विरोधात उमाकांत सोनवणे लढले. यामध्ये नसीर अहमद जहागीरदार यांना ११४ तर बळीराम सोनवणे यांना ११३ मते मिळाली. जहागीरदार हे एका मताने विजयी झाले. शाम उडाणशिवे यांना ११६ तर उमाकांत सोनवणे यांना १११ मते मिळाल्याने उडाणशिवे पाच मतांनी विजयी झाले.
पराभूत उमेदवारांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारी अर्जात रमेश उडाणशिवे हे १० ते १५ वर्षापासून बेपत्ता आहेत मात्र त्यांचे मतदान मुलाने केले असल्याचे म्हटले आहे. अंबादास उडाणशिवे, राधाबाई उडाणशिवे व मुरलीधर सोनवणे हे मयत असूनही त्यांचे मतदान झाले आहे. तसेच नागनाथ साबळे यांचे नाव मतदार यादीत १० व २०६ क्रमांकावर व किसन उडाणशिवे यांचे नाव ५६ व २८० नंबरला आहे. दोन्ही ठिकाणी मतदान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
---
आरक्षण नव्याने काढा.. तहसीलदारांकडे पत्र
वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे. मात्र येथे अनुसूचित जातीची महिला सदस्य नाही. हनुमंत गाडे यांनी निवडणूक उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना पत्र देऊन सरपंच आरक्षण नव्याने काढण्याची मागणी केली आहे.
- खेडचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. मात्र या संवर्गाचा सदस्यच नाही. तरी आरक्षण बदलून देण्यात यावे अशी मागणी नागेश कोकरे यांनी तहसीलदाराकडे केली आहे.
----