पंचायत समिती व झेडपीची डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत संपत आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात झेडपी, पंचायत समितीचे वारे वाहू लागले आहेत. मागील वेळी अंतर्गत गटबाजीचा फटका बसलेला मोहिते-पाटील विरोधकांची मोट बांधून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील दिसत आहेत. विकासकामे, दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर मोहिते-पाटील गट मोर्चेबांधणी करताना दिसत आहे, तर मित्रपक्षाचा आपल्या अस्तित्वासाठी सुरक्षित मतदार संघात राबता वाढल्याचे दिसत आहे.
मागील बलाबलाचा ताळमेळ हुकला
२०१७ साली झालेल्या निवडणुकात राष्ट्रवादी १४, भाजप ७, शिवसेना ८ असे सदस्य होते. भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाची अदलाबदल केली. यामुळे काही नेत्यांबरोबर गेले, तर काही आहे तिथंच थांबले. त्यामुळे सदस्यसंख्येचा ताळमेळ बसला नाही. मोहिते-पाटील गटाचे बहुमत असताना विरोधी गटाचे काही सदस्य मोहिते-पाटील गटात दाखल झाले. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची सत्ता बहुमतात राहिली, तर ११ झेडपी सदस्यांतही तिच स्थिती राहिली आहे.
कमी होणार की नाव बदलणार?
तालुक्यात जिल्हा परिषदेचे ११ गट तर पंचायत समितीचे २२ गण होते. मात्र, मागील काही वर्षांपूर्वी माळशिरस नगरपंचायत झाल्यामुळे या गटाचे नाव बदलले गेले. त्यानंतर, नुकत्याच अकलूज-माळेवाडी नगरपरिषद तर महाळुंग व नातेपुते या गावांचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यामुळे येथील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे नाव बदल होणार की, हे गट विसर्जित केले जाणार, याबाबत सध्या तरी तर्कवितर्क लढविले जात आहेत.