वैभववाडी / दोडामार्ग : काँग्रेस आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या किल्ल्या विकास आघाडीच्या हातात आहेत. तर कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपने १० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यामुळे येथे युतीचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे.पक्षीय पातळीवर विचार करता वैभववाडीमध्ये काँग्रेस, तर दोडामार्गमध्ये शिवसेना आणि भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राष्ट्रवादीला दोडामार्गमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. तर मनसेने एक जागा मिळवित नगरपंचायतीत चंचूप्रवेश केला.आमदार नीतेश राणे तीन आठवडे वैभववाडीत ठाण मांडून बसल्यामुळे काँग्रेस पक्षाची पत राखली गेली, तर भाजप व विकास आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी व मनसे भोपळाही फोडू शकले नाहीत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांपैकी काँग्रेसला सात, भाजप चार, गाव विकास आघाडी चार, शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल राहिले आहे. गाव विकास आघाडीतील बिनविरोध निवडून आलेल्या रवींद्र रावराणे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांची संख्या आठ झाली आहे. तर कसई-दोडामार्गमध्ये १७ जागांपैकी सेना व भाजपचे प्रत्येकी पाच, काँग्रेस चार, राष्ट्रवादी दोन आणि मनसे एक, असे पक्षीय बलाबल आहे. विजयी उमेदवार गायब?विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेला एक नगरसेवक रविवारी रात्रीपासून अज्ञातवासात गेल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीतून तो गेल्याचे बोलले जाते. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
वैभववाडी नगरपंचायत त्रिशंकू
By admin | Updated: November 2, 2015 23:58 IST