वैभववाडी : काँग्रेसमुक्त सिंधुदुर्गची सुरुवात वैभववाडी आणि दोडामार्गच्या जनतेने नगरपंचायतीच्या निवडणुकीद्वारे केली आहे. ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीत सत्ता स्थापनेसाठी आम्ही विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काँग्रेस विरोधी सत्ता स्थापनेबाबत विकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करु, अशी घोषणा माजी आमदार प्रमोद जठार यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली. विजयी मिरवणूकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी शिवसेना नेते जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, जेष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, तालुका प्रमुख अशोक रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सावंत, शिशिर परुळेकर, सरचिटणीस राजेंद्र राणे, नंदू शिंदे आणि महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. माजी आमदार जठार म्हणाले, वैभववाडीच्या नागरिकांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप आरपीआयच्या महायुतीच्या नवनिर्वाचित सहा नगरसेवकांचा पाठिंबा ग्राम विकास आघाडीला दिला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून वैभववाडी शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेसला विरोधात बसविणे आवश्यक असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतला असून विकास आघाडी आणि महायुती एकदिलाने काम करेल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला. जयेंद्र रावराणे म्हणाले, २४ तास एसीतून फिरणारे वैभववाडीत दुचाकीवरून फिरूनही काहीच करु शकले नाहीत. प्रभाग एक आणि अकरा राणेंनी प्रतिष्ठेचा केला होता. मात्र बैलगाडी चालविणारा काय करु शकतो हे आपण दाखवून दिले आहे, अशा शब्दात त्यांनी आमदार नीतेश राणे यांना टोला लगावला. तर प्रमोद रावराणे म्हणाले की, वैभववाडीच्या जनतेने आमदार नीतेश राणे यांना चांगलीच चपराक दिली आहे. कणकवली, मालवण, वेंगुर्लेसारखा राडा इथे चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले. त्यासाठी जनतेचे आभार मानतो. आमचा विजय आम्ही आदिष्टीदेवीच्या चरणी अर्पण केला आहे. त्यामुळे वैभववाडीचा नगराध्यक्षही आदिष्टीदेवीच्या मंदिरातच ठरेल, अशी ग्वाही दिली. (प्रतिनिधी)
महायुतीचा ग्रामविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा
By admin | Updated: November 2, 2015 23:57 IST