रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेत चार जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सामना आज मतमोजणीनंतर बरोबरीत सुटला. १ नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने प्रभाग २ मधील दोन्ही जागांवर विजय प्राप्त केला. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या उमेश शेट्येंसह दोन उमेदवारांनी विजय संपादन केला. रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद खालसा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीने हाणून पाडल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरीतील या पोटनिवडणुकीत सेना, भाजप, राष्ट्रवादी व मनसे रिंगणात उतरली होती. मात्र, खरी झुंज ही राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यातच होती. भाजपचा प्रचार गुप्तपणे सुरू होता. मनसेने २०१६मधील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच या निवडणुकीत दोन जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. पोटनिवडणूक असूनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव यांनी तसेच सेनेतर्फे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरीत प्रचारसभा घेतल्या. आज सकाळी रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहातील मतमोजणी केंद्रात सुरू झाली. प्रथम प्रभाग दोनमधील मतमोजणी सुरू झाली, अन पालिकेच्या परिसरात दोन्ही रस्त्यांवर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षकार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, काही वेळातच प्रभाग दोनमधील शिवसेना उमेदवार पूर्वा सुर्वे व ऋतुजा देसाई या विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यावेळी जयस्तंभ येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला. प्रभाग दोनमधील सेनेच्या विजयामुळे प्रभाग चारमध्येही तोच कल राहणार काय, याबाबत चर्चा सुरू झाली, अन कार्यकर्त्यांमध्ये हलचल निर्माण झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रभाग ४ मधील निकाल जाहीर करण्यात आला. बहुचर्चित उमेदवार उमेश शेट्ये व रुबिना मालवणकर हे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीला या पोटनिवडणुकीत प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. (प्रतिनिधी)शीळची माहेरवाशीण रत्नागिरीत नगरसेविकारत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग २मधून विजयी झालेल्या पूर्वा सुर्वे या अपात्र झालेल्या माजी नगरसेविका प्रीती सुर्वे यांच्या सुनबाई आहेत. शीळ गावातील आंबा व्यापारी राजन कदम यांची पूर्वा ही मुलगी असून, दोन वर्षांपूर्वीच तिचा प्रीती सुर्वे यांच्या मुलाशी विवाह झाला. शेट्येंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली!पालिकेच्या पोटनिवडणुकीत चारही जागा जिंकण्याचा दावा शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून केला जात होता. मात्र, दोन्ही पक्षांना दोन या समान जागांवर समाधान मानावे लागले आहे. उमेश शेट्ये यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद पुन्हा वाढल्याची चर्चा सुरु आहे.आपला पराभव झाला असला तरी या प्रभागातील काम सुरूच ठेवणार आहे. ज्यांनी मते दिली त्यांचा मी ऋणी आहे. -तन्वीर जमादार, पराभूत उमेदवारकार्यकर्त्यांबरोबरच सासूबाई प्रीती सुर्वे यांचे विजयात मोठे सहकार्य आहे. प्रभागात विकासकामांना चालना देऊ.- पूर्वा सुर्वे, विजयी उमेदवारसर्वच पदाधिकाऱ्यांमुळे विजय मिळाला. माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांचे विजयात मोठे योगदान आहे.- ऋतुजा देसाई, विजयी उमेदवार१९८६ च्या दंगलीत मी धर्मस्थळावर दगडफेक केली होती, असे खोटे सांगून मतदारांना भडकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही दिशाभूल मतदारांवर परिणाम करू शकली नाही. प्रभागाबाहेर राहणाऱ्या मतदारांना भेटण्यात आम्ही कमी पडलो. अन्यथा आमची मते आणखी वाढली असती. - उमेश शेट्ये.
रत्नागिरीत शिवसेना, राष्ट्रवादी फिफ्टी-फिफ्टी
By admin | Updated: November 3, 2015 00:06 IST