सिंधुदुर्गनगरी : आमदार दीपक केसरकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह ५ आॅगस्ट रोजी सेनेत प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात पडणारे खिंडार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत . आज, गुरुवारी शरद कृषी भवन येथे झालेल्या सभेमध्ये यासाठीची व्यूहरचना करण्यात आली.जिल्ह्यात राष्ट्रवादीला मित्र पक्ष काँग्रेसकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह सर्वांनीच बंड करीत काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली नव्हती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला होता. आता तर केसरकर यांनी आपण राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ते ५ आॅगस्ट रोजी सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत जातील, अशी भीती राष्ट्रवादीच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सर्वांनाच वाटत असून, या कार्यकर्त्यांना थोपविण्याची नामुष्की या सर्वांवर येऊन पडली आहे. त्यासाठी येथील शरद कृषी भवनमध्ये बैठकीचे आयोजन केले होते, असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)
खिंडार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न
By admin | Updated: July 31, 2014 23:23 IST