कुडाळ : आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी, घोटाळ्याचे होते. आमचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त व लोकोपयोगी असून, शिवसेनेबरोबर युती करूनच हे सरकार पुढील चार वर्षांत महाराष्ट्राचा विकास करेल, असे प्रतिपादन कुडाळ येथील लोकसंवाद कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी करीत आमच्या मुख्यमंत्र्यांना थापाड्या म्हणणारे नारायण राणे हेच खरे थापाडे असल्याची टीका त्यांनी राणेंवर केली. कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात युती सरकार स्थापनेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सुराज्याची वचनपूर्ती लोकसंवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, भाजप उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, नियोजन सदस्य काका कुडाळकर, चारूदत्त देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, दीपक शिरोडकर, विजय मराठे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेऊन काँग्रेसने फक्त राजकारण केले. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन सरकार स्थापनेपासून एका वर्षाच्या आत केले. काँग्रेसने याच स्मारकाच्या स्थापनेसाठी १२ वर्षे घालविली. यावेळी राजन तेली म्हणाले की, सरकारच्या वर्षपूर्तीच्या उत्सवासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, वर्षभरात सरकारने घेतलेले विकासात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व लोकसंवाद साधण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही कमी पडत आहोत. अनेक प्रश्न या सरकारने सोडविले व अजूनही सोडविणार आहे. वाळू, चिरे, मच्छिमारविषयी प्रश्न भाजपच्या मंत्र्यांनी सोडविले. एकीकडे सरकार चांगले निर्णय घेत असतानाच घाई मारून कोणी समुद्र्रात, तर अन्य ठिकाणी उपोषणास बसत आहेत. जरा धीर धरा, आमच्या सरकारच्या कामाचे चांगले निकाल लवकरच दिसतील. सर्व गोष्टींना विरोध केला तर कोकणचा विकास कसा होणार? विरोध करू नका, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
युतीचे सरकारच विकास करेल
By admin | Updated: November 2, 2015 00:27 IST