सावंतवाडी : काँग्रेस आघाडीचा तयार केलेला जाहीरनामा फसवा आहे. त्या जाहीरनाम्यातून मोठे काही निष्पन्न होणार नसल्याने काँग्रेसच्या नेते मंडळींना दारोदारी फिरावे लागत आहे, अशी जोरदार टीका माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दोडामार्ग व वैभववाडीत युतीचीच सत्ता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप सरचिटणीस मनोज नाईक, आनंद नेवगी, उमेश कोरगावकर, अमित परब, अन्नपूर्णा कोरगावकर आदी उपस्थित होते. माजी आमदार तेली म्हणाले, राज्यात सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून, सरकार आपली वर्षपूर्ती संवादाद्वारे साजरी करणार आहे. राज्य सरकारने अनेक विकासाची कामे केली असून ती कामे जनतेपर्यंत घेऊन जाणे हाच आमचा हेतू आहे. अनेक ठिकाणी भाजप चांगली कामगिरी करीत आहे. कल्याण-डोंबिवली तसेच कोल्हापूर या दोन महानगरपालिकेत आमचीच सत्ता येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रही युतीला पोषक असेच असणार असल्याचे यावेळी तेली म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेला जाहिरनामा हा फसवा आहे. या जाहिरनाम्याला कोणताही अर्थ राहिला नसून, अनेक फसव्या घोषणा या जाहिरनाम्यातून करण्यात आल्या आहेत. दोडामार्गमध्ये उपजिल्हा रूग्णालय असताना आणखी रूग्णालय कोठून उभे करणार, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसचे नेते राज्य सोडून आता पालिका निवडणुकीमध्ये घरोघरी प्रचार करण्यास थांबले आहेत. मात्र, दोन्ही नगरपालिकेत भाजप-शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वास यावेळी माजी आमदार तेली यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा फसवा
By admin | Updated: October 30, 2015 22:51 IST