सातारा : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला शत्रूच नाही. आपल्या कोणत्याही उमेदवाराला अन्य कोणत्याही पक्षाचा उमेदवार पराभूत करू शकत नाही, मात्र आपल्याच पक्षात राहून गडबड करणारे लोक आपला पराभव करू शकतात, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे मांडले.सातारा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘मिशन २0१४- राष्ट्रवादी निर्धार मेळावा’ झाला. त्यावेळी त्यांनी हे मत मांडले. कल्याण रिसॉर्टमध्ये झालेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. मकरंद पाटील, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. नरेंद्र पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. प्रभाकर घार्गे, आ. दीपक चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आ. विद्या चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, माजी आ. सदाशिवराव पोळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, ‘कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागणार आहे. कारण ती आपली शक्ती आहे. तो नाउमेद झाला अथवा खचला तर आपल्यापुढील अडचणी वाढणार आहेत. कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच आपण जिल्ह्यातून दोन खासदार देऊ शकलो. आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा आपल्याच ताब्यात कशा राहतील, यासाठी प्रयत्न करुया. राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्याने भरभरून दिले आहे.’आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही १४४ जागांची मागणी केली असून त्यावरच आम्ही ठाम असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्यात अंतर असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. त्याकडे कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करावे. आम्ही सारे एक आहोत. आपला पक्ष एक कुटुंब असून आपले प्रमुख शरद पवार आहेत. आगामी निवडणुकीसाठी आपल्या सोशल इंजिनियरींगचा प्रयोग करावयाचा आहे.’मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ‘साताऱ्यात योजना आम्ही आणतो आणि त्याचे राजकीय फायदा दुसरेच घेतात. आम्ही घेतलेले निर्णय पुर्णत्वाकडे आणण्यासाठी विलंब लावला जातो. आमची खरी लढाई विरोधकांबरोबर असायला हवी होती. मात्र, तसे होत नाही. आमची लढाई आमच्या मित्रपक्षाबरोबरच आहे. आघाडी सर्वत्र पाळूया नाहीतर आमचीही स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने आम्हाला तसा आदेश द्यावा, आम्ही लढाईला तयारच आहे.’रामराजे यांनीही काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘आमची लढाई काँग्रेसबरोबरच आहे. जिल्ह्यात आघाडी टिकणार नाही, याची आम्हाला कल्पना आली आहे. मुख्यमंत्री आमच्या मनाविरूध्द इतरांना सहकार्य करत आहेत. त्यामुळे आम्हला आघाडी नकोच. काँग्रेसचा शत्रू कोण असेलतर राष्ट्रवादी, असे सांगितले जात आहे. एका बाजूला यांच्या लोकांनीच आघाडीची भाषा करायची आणि दुसरीकडे राष्ट्रवादीला क्रमांक एकचा शत्रू मानायचे. काही गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला जाणीवपूर्वक काँग्रेसची मंडळी त्रास देत आहेत. त्यांना जर आमच्याबरोबर नांदायचे नसेल तर घटस्फोट घ्यावा. आम्हाला स्वत:ची अस्मिता आहे. आमच्याकडे ताकद असल्यामुळे आम्ही लढतो. आम्ही तर वाघच आहे.’ यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती सदस्य किरण साबळे-पाटील, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील, सुधीर धुमाळ, समिंद्रा जाधव, बाळासाहेब महामुलकर, विजय कुंभार, अॅड. थोरात, सागर जगताप, कांचन साळुंखे, सुश्मिता धुमाळ, स्मिता देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माणमध्ये अनेकांचे गुडघ्याला बाशिंग...अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत माणच्या राजकारणावर टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी आणखी बळकट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहेत. माणची जागा आपल्याच काही लोकांच्या गडबडीमुळे गेली. माणमध्ये तर अनेकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले असून ‘मीच उद्याचा माणचा आमदार’ अशी घोषणाबाजी करू लागले आहेत. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात माण वगळता आपण बाकीच्या जागा आपण निवडून आणल्या. वाई आणि कऱ्हाड उत्तरमध्ये आपण आघाडी घेतली, मात्र आता त्यामध्ये सातत्य टिकवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे.’ दरम्यान, रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही माणमध्ये आता दुष्काळ असला तरी उमेदवारांचा मात्र सुकाळ असल्याचे सांगताच आणखी एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.पवारांवर टीका करणारांना मोठे झाल्यासारखे वाटते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘शरद पवारांवर टीका केली की अनेकांना मोठे झाल्यासारखे वाटते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तेच केले. कृषी मुल्य आयोगावरून शरद पवारांच्यावर टीका करणारे आता नरेंद्र मोदींच्या पुढे गुडघे टेकत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करा, असे सांगण्याची वेळ स्वाभिमानीवर आली आहे.’या वाड्यावर नाही तर त्या वाड्यावर...दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द झालेल्या बातमीचा दाखला देतच अजित पवार यांनी मी आईस्क्रीम खात नसल्याचा खुलासा केला. कारण नसताना काही मंडळी आमची बदनामी करत आहे तर काही मंडळींचे आमच्यावर खूप प्रेम असल्याचे नमूद करतच पवार म्हणाले, ‘शिवेंद्रसिंहराजे मला कधी जेवायला बोलावणार याची आम्ही वाट पाहतोय. त्यांच्या वाड्याचे काम कधी होणार याचीच प्रतीक्षा आम्हाला आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, ‘आमच्या वाड्यावर नाही तर मग ‘त्या’ वाड्यावर जेवण करू,’ अशी माहिती पवारांनी देताच एकच हशा पिकला.धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण हवेचराष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात मराठा आरक्षणाविषयी भाष्य करत असतानाच प्रमुख वक्त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. याचीच री ओढत अजित पवार यांनीही लवकरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासाठी नुकतीच बैठक झाली असून त्यासाठी एक समिती अभ्यास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीने या संदर्भात जाहीर भूमिका घ्यावी आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी रामराजेंनी केली.जाहिरातीतील काकू कुठे गेली..?अजित पवार यांनी अच्छे दिनची खिल्ली उडविली. लोकसभा निवडणूक काळात भाजपच्या ‘अच्छे दिन’ची जाहिरात करणारी काकू कुठे गेली असा सवाल केला. मुंबई भाजप अध्यक्षांनी पाच रुपयांत जेवण मिळते, असे सांगितले. माहिती न घेता, त्यांची बडबड सुरू आहे. यावर टीका झाली तर ते ‘आम्ही ‘अच्छे दिन’ म्हटले होते, ‘स्वस्ताई’ नाही,’ असे सांगत त्याचे समर्थन करत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. दरम्यान, पवारांनी हा किस्सा सांगण्यापूर्वी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या काकूंचा शोध घेत असल्याचे नमूद केले होते. आता सत्कार बास झाले..!अजित पवार यांचे पावणेएकच्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी गर्दी उडाली. युवक आघाडी, विद्यार्थी आघाडीने सत्कार केल्यानंतर आणखी काही सत्कार करणार असल्याची घोषणा झाली. यावेळी अजित पवार संतापले आणि त्यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या नितीन भरगुडे-पाटलांना सूचना केली आणि आता सत्कार बास झाले, असे सुनावले.युवकची ई-कार्यकर्ता नोंदणीराष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसकडे ‘ई-कार्यकर्ता नोंदणी’ची जबाबदारी दिली आहे. सातारा येथील निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांच्याकडून आढावा घेतला. दरम्यान, राष्ट्रवादी युवकने सुमारे २0 हजार ई-कार्यकर्ता नोंदणी केल्याचे सादरीकरण अॅड. भोसले यांनी पवारांच्या समोर केले. सादरीकरणानंतर पवारांनी युवक कार्यकारिणीचे कौतुक केले. यावेळी विक्रांंत डोंंगरे, पै. निलेश जाधव-पाटील, जयकुमार इंगळे, अमित पाटील, प्रवीण मोरे, सौरभ निंबाळकर, गिरीश फडतरे, मामा देशमुख, ज्ञानेश्वर गायकवाड, सागर जगताप, रुपेश साळुंखे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचा स्वबळाचाच नारा...राष्ट्रवादीच्या बहुतांशी नेत्यांनी निर्धार मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला आहे. सुनील तटकरे यांनी तर राष्ट्रवादीने सत्तास्थापनेच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत आता आपल्याला स्वत:चे सरकार आणावयाचे असल्याचे नमूद केले. मंत्री शशिकांत शिंदे यांनीही काँग्रेसकडून आमच्या मतदारसंघात फूट पाडली जात असून आम्हालाच आघाडी धर्माचे धडे दिले जात आहेत, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आघाडी पाळायची की नाही याचा विचार करावाच लागेल. आमचीही स्वतंत्र लढण्याची तयारी आहे.’ नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे यांनीही ‘आघाडी होणार की नाही, ते अगोदरच सांगा. आम्ही आमची पावले टाकायला तयार आहे. मित्रपक्षांने आम्हाला खूप त्रास दिला आहे,’ असे स्पष्ट केले.
आपलेच लोक ‘गडबड’ करतात
By admin | Updated: July 19, 2014 23:25 IST