विशाल गुजर, परळी : प्रागतिक विचारांची परंपरा असलेल्या साताऱ्यात पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त उत्सव-समारंभांसाठी प्रबोधनात्मक प्रयत्न अनेक जनसमूह करीत आहेत. या प्रयत्नांत पोलिसांनीही आपला वाटा उचलण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील १३० गावे व २२ वाड्या-वस्त्यांमध्ये ‘डॉल्बी’ आणि गुलालबंदी करण्याचा विडा सातारा तालुका पोलीस ठाण्याने उचलला आहे.सातारा तालुक्यातील सर्वाधिक गावे परळी खोऱ्यात वसली आहेत. याखेरीज महामार्गावर शेंद्रे-वळसेपर्यंत, दुसऱ्या बाजूला रायगाव फाट्यापर्यंत, मेढा विभागात चिंचणीपर्यंत पूर्वेला शिवथर आणि जिहे-निगडीपर्यंत तसेच कण्हेर विभागात वेण्णानगरपर्यंत परिसर तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. एकंदर १३० गावे आणि २२ वाड्या-वस्त्या मिळून १५२ गावठाणे तालुक्याच्या हद्दीत येतात. उत्सव-समारंभात, लग्नाच्या वरातीत डॉल्बीचा वापर केल्यामुळे ठिकठिकाणी वादावादी, हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत Þडबेवाडीजवळ नुकताच खुनाचा प्रकार घडला. त्यानंतर डबेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलावून डॉल्बीबंदीचा उत्स्फूर्त निर्णय घेतला. डॉल्बीच्या बरोबरीने मद्यपान केलेच पाहिजे, असा जणू नियम असल्याप्रमाणे अनेक लोकांचे वर्तन असते. परिणामी, वादावादी, हाणामाऱ्या होतात. शिवाय, डॉल्बी केवळ करमणुकीपुरती उरत नाही. तिच्या तालावर नाचणाऱ्यांनाच केवळ आनंद मिळतो; मात्र इतरांना अनेक प्रकारे फक्त त्रासच होतो. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉल्बीबंदी करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.तालुका पोलिसांच्या अखत्यारीत ३ लाख ३५ हजार लोकसंख्या येते. हद्दीत एकंदर २३२ गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांशी डॉल्बीबंदीच्या विषयावर संवाद साधला जाणार असून, गावोगावच्या पोलीस पाटलांशी प्रारंभिक चर्चा करून पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. पोलीस पाटील मंडळांशी संपर्क साधत आहेत. गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाला केवळ दोन स्पीकर वापरण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येणार आहे. ‘डेसिबल’ची मर्यादाही काटेकोरपणे पाळली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रात्री दहानंतर स्पीकर लावण्यास बंदी असेल. राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप आणि मध्यस्थी न जुमानता कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले. गुलालावरील खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी मंडळांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मिरवणुकीतील राडेबाजीची आकडेवारीउत्सवातील मिरवणुकीत आणि लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या राड्यांची मोठी आकडेवारी पोलिसांकडे उपलब्ध आहे.२०११ मध्ये ११ गुन्ह्यांची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली. २०१२ मध्ये अशा स्वरूपाचे ८ गुन्हे घडले. २०१३ मध्ये १३ ठिकाणी राडे झाले. २०१४ मध्ये आजअखेर २ गुन्ह्यांची नोंद असून, त्यातील एक गुन्हा खुनाचा आहे.गुलालाऐवजी लाह्या-चुरमुरे उधळागुलालातील घातक रसायनांमुळे त्वचेवर आणि श्वसनयंत्रणेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने मिरवणुकीत गुलालाऐवजी चुरमुरे, लाह्यांचा वापर करावा, अशी सूचना तालुका पोलिसांनी केली आहे. गुलाल लावण्यावरून भांडणे-वादावादीही होऊ शकते. असे प्रकार टाळण्यासाठी गुलालच टाळावा, असा सक्रिय प्रयत्न पोलीस यंदा करणार आहेत. शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दरवर्षी ‘गणराया अॅॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी तालुक्यातील मंडळांना ‘एक गाव एक गणपती’सारखे उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
सातारा तालुक्यात यंदा डॉल्बीबंदी
By admin | Updated: June 23, 2014 00:52 IST