भैरेवाडी गावात गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कड्याचा काही भाग कोसळू लागल्याने सुमारे बारा घरांना धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी तातडीने या ठिकाणच्या बारा कुटुंबांसाठी तात्पुरती निवारा शेड बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, शेडचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाळू मिळू शकत नसल्याने ग्रिडचा वापर करत त्यामध्ये खडी मिसळून अत्यंत कमी सिमेंट वापरत पाया भरण्यात आला आहे. तसेच कमी वजनाच्या पाइप, कमी गेजचा पत्रा, कमकुवत अँगल वापरून हे काम केले जात आहे. या शेडमध्ये येथील बारा कुटुंबे राहण्यास जाण्यापूर्वीच निवारा शेडची दुरवस्था होईल. हे काम काही स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून शासनाचा निधी हडप करण्याच्या उद्देशानेच केले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून कामाच्या चौकशीचे आदेश द्यावेत. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
- चौकट
ठेकेदार म्हणे... परवडत नाही!
भैरेवाडीतील शेडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे काही ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी हे काम आपणास वाहतूक लांब असल्याने परवडत नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. तसेच स्थानिक पुढाऱ्यांच्या आग्रहाखातर आपण हे काम करत असल्याचेही ठेकेदार सांगत आहे.