कऱ्हाड : जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतीसह जनावरांची अवस्थाही चाऱ्याअभावी बिकट बनली आहे. त्यात अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शासनाकडूनही काही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून कऱ्हाड येथे तुळशी विवाहासाठी वापरला गेलेला ऊस हा एकत्रित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मंगळवारी विक्रम पावसकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. चार ते पाच टेम्पोच्या माध्यमातून तालुक्यातील सुपने, साकुर्डी, शेरे, दुशेरे, राजमाची अशा ग्रामीण भागातून सोहळ्याचा ऊस घरोघरी जाऊन एकत्र करून तो दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी बुधवारपासून संपूर्ण तालुक्यात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. गुरूवार, दि. २६ रोजी संपूर्ण तालुक्यातून तुळशी विवाहासाठी वापरलेला ऊस एकत्र करून तो दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठविला जाणार आहे. तुळशी विवाहासाठी आणलेला ऊस हा नंतर लोकांकडून फेकून दिला जातो. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुळशी विवाहाच्या दिवशी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऊस तोडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हातातोंडाशी आलेला ऊस अशा धार्मिक कार्यासाठी तोडला जातो. इतकेच की काय शहरात तर या उसाची तुळशी विवाहा दिवशी मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जाते. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी उसतोड करून नुकसान करण्यापेक्षा जनावरांना अन्न दिल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकेल. दुष्काळग्रस्त भागात सध्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून ऊसदान हा उपक्रम राबविला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना थोड्या प्रमाणात का होईना चारा मिळणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. (प्रतिनिधी) हिंदू एकताच्या उपक्रमास ‘कऱ्हाडकरांचा’ प्रतिसाद दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून तुळसी विवाहाचा ऊस हा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मंगळवारी कऱ्हाड शहरातून ऊस एकत्र करण्यात आला. या उपक्रमास कऱ्हाडकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. घरगुती महिलांनी तुळशी विवाहासाठी आणलेला ऊस हिंदू एकताच्या वतीने आणलेल्या टेम्पोमध्ये स्वत: आणून दिला. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खटाव तालुक्यातील जनावरांसाठी तुळशी विवाहासाठी वापरण्यात आलेले ऊस गोळा करून तो पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याला कऱ्हाडसह तालुक्यातील अनेक गावच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. - विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कऱ्हाड
‘लग्न तुळशी’चं... ‘गोडधोड’ मुक्या प्राण्यांना!
By admin | Updated: November 25, 2015 00:37 IST