पिंपोडे बुद्रुक : जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची गरज आहे. पाण्याच्या बाबतीत फक्त स्वत:च्या गावाचा विचार न करता संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विचार करायला हवा आणि एकमेकांच्या सहकार्यातून सर्व गावांचा विकास व्हायला हवा,’ असे मत ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त कल्पना साळुंखे यांनी मांडले.
ग्रामगौरव प्रतिष्ठान व लोकगौरव विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, रणदुल्लाबाद, पळशी आदी गावातील शेतकऱ्यांची पाणी पंचायतच्या खळद येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यशाळा पार पडली. यावेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांना जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि बाजारपेठ यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. सोनाली शिंदे म्हणाल्या, ग्रामगौरव संस्थेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथील विविध प्रश्नांची ओळख झाली. उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या अपेक्षेने रासायनिक खतांचा वापर केले जातो. ते न करता आपल्या आरोग्य आणि भविष्यातील पिढीला काही उज्ज्वल भविष्यासाठी सेंद्रिय शेती करावी. त्याच्या माध्यमातून स्वत:चा विकास साध्य करावा.
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, दहीगाव, रणदुलाबाद, पळशी आदी गावांतील एकूण ४२ जलमित्र व शेतकरी यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यात शेतकऱ्यांना जमीन, वनस्पती, पाणी आणि मनुष्य यांच्यातील संबंध तसेच शेती, पाणी, शेती मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील दुपारच्या सत्रामध्ये शेवरी गावातील एकनाथ कामठे यांच्या शेतावर शेतकऱ्यांनी भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली.
फोटो : ०९ शेतकरी कार्यशाळा
खळद येथील प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या शेतकरी कार्यशाळेत कल्पना साळुंखे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.