पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया बापूसाहेब पिसाळ या कऱ्हाडवरून रिक्षाने करवडीला निघाल्या होत्या. करवडीत उतरल्यावर पर्समधून दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, काळ्या मण्यातील सोन्याची वाटी व मणी तसेच पायातील जोडवी असा १ लाख ११ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, रिक्षात शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांवर संशय आल्याने त्यांनी कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे शशिकांत काळे, सज्जन जगताप, अमित पवार, उत्तम कोळी, महिला पोलीस पुनम चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून पूजा अप्पाराव साखरे (वय २७, रा. चिखलपाडा, औरंगाबाद) व काव्या अप्पाराव साखरे (२२, रा. चिखलपाडा, औरंगाबाद) या दोघींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघींनी आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.