औंध: औंधमध्ये जलक्रांती घडविण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभाग, श्रमदान आणि लोकवर्गणीतून गावाच्या उत्तरेकडील ‘तेलकी’ तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. १००० फूट लांबीच्या तलावाच्या भिंतीतील पाणी गळती रोखण्यासाठी लोकवर्गणीतून सुमारे ३ लाख रुपयांचा कागद टाकण्यात आला आहे. येथील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणार आहे. खटाव तालुक्यातील औंध भागातील जनतेला कधी नव्हे ते यंदा मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाण्यासाठी झालेली ससेहोलपट थांबविणे व औंधला पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी औंधकर एकवटले आहेत. औंध गावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच काही अंशी सुमारे १७५ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील चार महिन्यांपासून औंधकरांनी कंबर कसली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औंध गावासाठी वरदान ठरणाऱ्या तेलकी तलावाच्या बांध भिंतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. ३३० मीटर लांब म्हणजेच १००० फुटापेक्षा अधिक लांबीच्या बांधभिंतीच्या आतील भागात सुमारे २५ ते ३० फूट खोल सीओटी चर खणण्यात आली आहे. बांधाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या सीओटीच्या तळापासून पाण्याची पूर्णपणे गळती रोखण्यासाठी कागद टाकण्यात आला आहे. मागील दीड महिन्यापासून तेलकी तलावाच्या बांध भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सुमारे ३५० ग्रामस्थांनी तसेच शेतकरी, युवकांनी सहभाग नोंदवून दिवसभर तेलकी तलावाच्या बांध भिंतीवर कागद टाकण्यासाठी श्रमदानातून परिश्रम केले. या तेलकी तलावाच्या कामासाठी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी एक लाख रुपयांची वर्गणी दिली आहे. त्यांच्यासह औंध गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, छोटेमोठे व्यावसायिक, नोकरदार, ग्रामस्थांनी सुमारे २ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीतून याकामासाठी दिला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गव्हाळा तलावामध्येही लोकवर्गणीतून ९३ हजार रुपयांचा कागद टाकून तलावाचे काम पूर्ण करण्यात आले होते. दत्तात्रय जगदाळे, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, वसंत जानकर, प्रभाकर यादव, सी. व्ही. कुंभार, नंदकुमार इंगळे, प्रशांत कुंभार, हणमंत खैरमोडे, रवी थोरात, इलियाज पटवेकरी, रमेश जगदाळे, सचिन पवार, नितीन आंमले, सदाशिव इंगळे, शेतकरी, विविध मंडळाचे युवक, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी याकामासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, आ. प्रभाकर घार्गे यांनी तेलकी तलावाच्या कामाची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हणमंत शिंदे, राजेंद्र्र माने, दीपक नलवडे, इलयाज पटवेकरी, प्रकाश महंत, वसंत माने उपस्थित होते. औंध येथील पाझर तलावांच्या कामासाठी जलसंपदा यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. भोसले, शाखा अभियंता ए. पी. जाधव कर्मचारी सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर) आता ६ फूट पाणीपातळी वाढण्यास मदत...लोकवर्गणीतून सुमारे ३ लाख रुपयांचा निधी गोळा करून एक वेगळा आदर्श औंधकरांनी सर्वांसमोर ठेवला आहे. यातून २ पाझर तलावांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर तेलकी तलावाचे खोलीकरण ही लोकसहभागातून केले जाणार आहे. दोन्ही तलावाच्या कामांबरोबर औंध गावातील ऐतिहासिक नागाळे तळ्यातील सुमारे २ एकर क्षेत्रातील अडीच हजार ट्रॉल्या गाळ ही मागील महिन्यात लोकसहभागातून काढण्यात आला आहे. त्याचा परिणाम ५ ते ६ फूट पाणीसाठा वाढणार आहे.
तलावात कागद टाकण्यासाठी हजारो हात एकवटले...
By admin | Updated: June 13, 2016 00:20 IST