लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला अरबवाडी पाझर तलाव यंदाही सध्या पडत असलेल्या पावसाने भरून वाहू लागला आहे. शेतकऱ्यांनी जलपूजन करुन आनंद व्यक्त केला.
गतवर्षी पडलेल्या समाधानकारक पावसाने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील सर्वच पाझर तलाव भरले होते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गरज भागवून धरणात यावर्षी मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यात यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने या भागातील अरबवाडी हा तलाव सर्वप्रथम भरला आहे. सध्या या तलाव्याच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या अरबवाडी, खामकरवाडी, अंबवडे, बनवडी, इब्राहिमपूर गावातील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या तलावातील पाण्यातून या परिसरातील अनेक गावांची शेती तसेच पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यास मदत होत असल्याने हा तलाव भरण्याची सर्वांना प्रतीक्षा होती. यावर्षी जून महिना पावसाअभावी पूर्ण कोरडा गेल्याने हा तलाव कधी भरणार, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने हा तलाव आता भरुन वाहत आहे. या तलावाचे जलपूजन करण्यात आले.
फोटो १२ अरबवाडी तलाव
अरबवाडी तलाव भरल्यामुळे मंगेश धुमाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी बनवडीचे सरपंच बाळासाहेब नलगे, दुधनवाडीचे सरपंच सुदर्शन नलगे उपस्थित होते.